Friday, October 11, 2019

मोरगिरी - सुखद अनुभव ! - Morgiri

पाचे आज पुन्हा मृगगडाच्या वाटेवर होती. मृगगडावर मी अगदी महिन्याभरापूर्वीच जाऊन आलो होतो. पण आजची फेरी श्रुती (बायको) साठी होती. आम्हाला दोघांनाही गड-किल्ले भ्रमंतीची आवड असल्यानं आमच्यात एक अलिखित नियम पडला आहे. जर मी एखादा किल्ला तिच्याशिवाय बघितला, तर तिच्यासोबत तो पुन्हा बघायचा. आणि मलाही आवडतं हे. आपले किल्ले आहेतच असे. पुन्हा पुन्हा जावसं वाटणारे !

NH४ वरती अपाचे पळत होती. कामशेतचा तो छोटा घाट पार केला तसा डावीकडील भातराशीच्या मागून आभाळात घुसलेला डोंगराचा एक सुळका डोकावू लागला.

मोरगिरी !

प्रत्येक वेळेस तिथून जाताना तो खुणावत असतो. आजही त्यानं साद घातली.

"श्रुती, मोरगिरी. व्हायचाय आपला."
"जायचं का?"
"चला लगेच. तसंही मी परवाच डिटेल्स काढून ठेवलेत."

मृगगडाची मनातल्या मनात माफी मागून गाडी लोणावळ्यातून डावीकडे वळवली.
मोरगिरी तसा अल्पपरिचित किल्ला. थोड्या अवघड श्रेणीतला. त्यामुळे गर्दीची लागण ह्या किल्ल्याला झालेली नाही.
लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगड ह्या किल्ल्यांवर मी अनेक वेळेस आलोय. दर वेळेस मोरगिरीचा हा डोंगर साद घालायचा. कोराईगडावरून बघितल्यावर ह्या डोंगरानं तुंगला ग्रहण लावलेलं दिसतं.
काही वर्षांपूर्वी शाखेतील एका शिक्षकांना ह्याबद्दल विचारलं तेव्हा समजलं कि हा डोंगर म्हणजे मोरगिरी नावाचा किल्ला आहे.

इतक्या जवळ, पण इतका अपिरिचित !

२०१५-१६ च्या सुमारास साईप्रकाशच्या ब्लॉग मध्ये ह्याबद्दल चांगली माहिती मिळाली. गेल्या दीड एक वर्षांपासून ट्रेकक्षितिज वरही मोरगिरीची चांगली माहिती समाविष्ट केलेली आहे.
हिमांशू सोबतही बोलणं झालं होतं. तो नुकताच जाऊन आला होता. त्यानं दिलेली माहितीची शिदोरीही सोबत होतीच.

जांभुळणे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. गावाच्या बुद्धवस्तीपाशी गाडी लावली. अनिल आणि राम ह्या गावातल्या छोट्या पोरांनी आम्हाला रस्ता दाखवला. पंधरा-वीस मिनिटांच्या चढाई नंतर आम्ही एका विस्तीर्ण पठारावर आलो.
मोरगिरी म्हणजे ह्या विस्तीर्ण पठारावर साधारण मध्यभागी असलेला एक उंच कातळ. आमच्या जागेपासुन तो फार लांब अंतरावर दिसत होता. इथून किल्ल्यापर्यंत कसं जायचं ते सांगून अनिल आणि राम मागे फिरले.

पठारावर आल्यावर लांबवर असणारा मोरगिरी !
त्या प्रचंड पसरलेल्या पठारावर आता आम्ही दोघंच होतो. अधून मधून धुकं येऊन वातावरण अजून गूढ करत होतं. ट्रेक-क्षितिज वर मोरगिरी हा कठीण श्रेणीतील किल्ला असं नमूद केलं आहे, आणि त्यांनी दिलंय म्हणजे नक्कीच असणार !
आज खूप दिवसांनी अश्या आडवाटेवरच्या किल्ल्यावर येणं झालं होतं.
भोवतालच्या ह्या वातावरणामुळे मनात थोडी चलबिचल होती. असं गूढ वातावरण मी बऱ्याच वेळेस अनुभवलं आहे. पण सोबत तीन-चार जणांचा ग्रुप असेल तर त्याचं दडपण येत नाही. आज मात्र आम्ही दोघंच.
मध्येच मला बाई-माणसांच्या गप्पांचा पुसटसा आवाज ऐकू येत होता. लांब लांब वर कोणीच नव्हतं. किल्ला जवळपास दीड-दोन किलोमीटर अंतरावर होता. हे पठाराची बऱ्यापैकी उंचीवर होतं. त्यामुळे एकतर ह्या आवाजाचा मला भास होत होता, किंवा वारा कुठूनतरी लांबून हा आवाज माझ्यापर्यंत घेऊन येत होता.
श्रुतीला हे सांगून उगाच तिची भीती मी वाढवली नाही.

तसा ह्या किल्ल्याच्या आजूबाजूचे डोंगर आणि परिसर माझ्या परिचयाचा होता. आज मात्र निसर्गासोबत नीट कनेक्ट होत नव्हतं.

पावलं भरभर टाकायला सुरुवात केली.

"काय रे .. होईल ना? कुठच्या कुठंय बघ किल्ला अजून.."
"होणार होणार ... चल भरभर"
शक्य तितक्या लवकर त्या सुळक्याच्या पायथ्याशी पोचायचं असा बेत होता.

त्या पठारावरून आम्ही डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत साधारण वीसेक मिनिटं चाललो. वाट अगदी सरळ सपाट होती. आता किल्ला डावीकडे आला होता. ते पठार मात्र उजवीकडे 'कैच्याकै' लांबपर्यंत पसरलं होतं.


आता फक्त इतकी चढाई बाकी !

आम्ही वरती चढायचा मार्गच शोधात होतो. तितक्यात समोर थोड्या अंतरावर गावातली काही मुलं दिसली. तेव्हा खूप बरं वाटलं. चलबिचल, भीती, काळजी सगळं एका क्षणात गायब ! हातापायात नवा त्राण शिरला.

माणसाला माणसाची सोबत किती महत्वाची आहे !




त्या मुलांना पुढच्या चढाईचा रस्ता विचारला. इथून पुढे त्या कातळावर चढाई सुरु ! सुरुवातीला दाट जंगलातून, आणि पुढे कारवीच्या झुडुपातून वाट भरभर वर चढत गेली.


पावलागणिक उंची वाढत होती. पावसाळा असल्यानं माती ओली होती. त्यामुळे चांगली पकड मिळत गेली. उन्हाळ्यात मात्र इथे प्रचंड घसारा असणार, आणि हाच चढ अधिक धोकादायक होणार ह्यात शंका नाही. उन्हाळ्यात इथे येणं टाळावं.
वाटेत एक दोन ठिकाणी सात-आठ फुटांचे अवघड टप्पे लागले. हे सर्व पार करून आम्ही गडमाथ्याच्या अगदी जवळ पोचलो होतो.
इथे काही चपला दिसल्या. ह्याचा अर्थ वर अजून लोक आहेत.
अरे हो, आज नवरात्रातील अष्टमी !
आम्ही पण आमची पादत्राणे इथेच सोडली. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला खडकात पाण्याचं टाकं दिसलं. ते पूर्ण भरून ओसंडून वाहत होतं.

काही मिनिटात आम्ही 'जाख'-देवीच्या ठाण्यात पोचलो. तांदळाच्या रूपात असलेली हि जाखदेवी ह्या भागातील लोकांची कुलस्वामिनी.
देवीचं ठाणं म्हणजे कातळात खोदलेली, अंदाजे पाच बाय सहा फूट इतकी छोटीशी गुहा आहे. ह्याच गुहेत एक पाण्याचं टाकं आहे. एका शेजारी एक अशी जेमतेम पाच-सहा मंडळी बसतील इतकीच गुहेच्या बाहेर जागा. समोर तीनशे फुटांचा थेट ड्रॉप !

देवीचं मनोमन दर्शन झालं, चांगभलं रे देवा चांगभलं !

तिथेच मांडून ठेवलेला खोबऱ्याचा प्रसाद घेतला. गावातील काही मंडळी देवीच्या दर्शनाला आलेली होती. सर्वांसोबत तोंडओळख झाली.
पठारावरून चालत असताना ह्यांच्याच गप्पांचा आवाज मला ऐकू येत होता.

देवीच्या गुहेशेजारीच वर जाण्यासाठी पाच-सात फुटांची छोटी शिडी लावली आहे. पूर्वी हि शिडी नव्हती, त्यामुळे हा पॅच अधिकच कठीण होता. शिडीवरून जाताना पाठमोरी बघितलं तर डोळे चक्रावतील अशी खोल दरी !


अगदी थोडक्या जागेत उभी असणारी मंडळी. तिथेच डाव्या बाजूला देवीचंठाणं आणि समोरच्या कातळ भिंतीवर शिडी आहे.

शिडीमुळे आम्हा गरिबांची सोय झाली. नाहीतर शक्य वाटत नव्हतं. शिडी चढून गेल्यावर पुढे खोदीव पायऱ्या लागल्या. त्या पार केल्या आणि आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोचलो !
गडमाथ्याचा विस्तार अगदी थोडका. वरती पाण्याचं एक टाकं आणि बांधकामाचे काही अवशेष विखुरलेले होते.
किल्ल्याचा उपयोग मुख्यत: जवळच कोकणात उतरणाऱ्या पायमोडी घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा.
माथ्यावरील पाण्याचं टाकं
पूर्वीच्या काळी ह्या किल्ल्यांवर लोक कसे रहात असावेत ह्याची आपण केवळ कल्पना करावी.. मोरगिरी काय, कोकणदिवा काय.. इतरही काही किल्ले... इतकीशी टीचभर जागा तिथं. असे किती लोक मुक्कामी असावेत?
शक्य नाही वाटत. पण ते सत्य आहे. ते बांधकाम, ती पाण्याची टाकी, खोदीव पायऱ्या.. कोणी बांधलं हे सगळं?
आजूबाजूच्या किल्ल्यांवर चमकणाऱ्या मशालींच्या उजेडानीही किती धीर मिळत असेल त्यांना !

इथून दिसणारं दृश्य मात्र खरोखर मन मोहून टाकणारं होतं.


परम पवित्र भगवत ध्वज की जय !

कातळ चढताना खाली पसरलेलं पठार

पावना धरणाचे दृश्य !

समोरच असणारा तुंग किल्ला आणि अलीकडला किल्ल्यासादृश  भासणारा डोंगर.


जांभूळणे गावातून किल्ल्याचा मार्ग दिला आहे.

हेच ते शिखर जे इतकी वर्ष NH४ वरून जात येता खुणावत होतं. आज आम्ही त्या शिखरावर पोचलो!
आज मोरगिरीला भेटलो.
समोर तुंग अक्षरश: ठेंगणा दिसत होता. त्यामागे लोहगड, विसापूर, भातराशी, उजवीकडे तिकोना, मागे कोरीगड असे किल्ले नजरेस पडत होते.

हे सगळं सगळं मनात साठवून, किल्ल्यावरचे ते काही क्षण सोबत घेऊन आम्ही निघालो. पुन्हा देवीच्या ठाण्यापाशी आलो. सोबतच तिथे आलेली मंडळी निघाली. पटपट उतरत पंधरा मिनटात आम्ही पठारावर पोचलो सुद्धा ! इथून सर्व मंडळी आपल्या वाटेने निघाली. किल्ल्यावर येण्यासाठी अजूनही एक वाट प्रचलित आहे. ती लोकं तिकडून आली होती.
आम्ही आमच्या वाटेनं निघालो.

पुन्हा लांबवर पसरलेलं ते पठार. पण आता भीती पेक्षा त्या जागेबद्दल एक आपुलकी निर्माण झाली होती. मनात मोरगिरी बघितल्याचा अपार आनंद ! आणि आम्ही खऱ्या अर्थानं त्या निसर्गाशी एकरूप झालो होतो ! परतीच्या वाटेवर कणभरही भीती वाटली नाही. भरपूर फोटो काढले. पठारावर काही क्षण निवांत बसून घालवले. काही वेळात खाली उतरलो.

एक थरारक पण उत्साहवर्धक अनुभव घेऊन.




किल्ले भ्रमंतीचा पुरेसा अनुभव सोबत असेल तर किल्ला खूप अवघड नाही. तरीसुद्धा जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. 
जाण्यासाठी उत्तम कालावधी - ऑक्टोबर, नोव्हेंरपर्यंत. नंतर घसारा वाढून चढाई उतराई अवघड होण्याची शक्यता आहे.

Leave nothing but footprints. Take nothing but memories.

11 comments:

  1. वाहह वाह ... कडक 👍

    ReplyDelete
  2. मस्तच की!!!
    आम्हाला सोडून🤔

    ReplyDelete
  3. भुषण, खरंच खूप छान लिहिलं आहेस

    ReplyDelete
  4. मस्स्त लिहिलंय एकदम �� समोरच दृश्य बघतोय अस वाटलं ��

    ReplyDelete
  5. १ नंबर जमलाय, माझा पण ब्लॉग आहे, Https://barvekedar.blogspot.com

    एकत्र ट्रेक होऊन जाऊदे एकदा

    ReplyDelete
    Replies
    1. वा केदार.. भरपूर लिहिलं आहेस की, सवडीनी वाचतो.
      IT admin, अहो ब्लॉगर तेव्हडं unblock करा की eQ मध्ये ;)

      Delete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...