Saturday, October 1, 2016

भुदरगड - Bhudargad

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग !
गड किल्ल्यांना परमोच्च महत्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. ह्या गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं.
महाराजांच्या नजरेत प्रत्येक किल्ल्याचं महत्व हे अनन्य साधारण होतं. त्यांनी एक एक किल्ला हा एक एक राज्य असल्याप्रमाणे जपला. कोल्हापूर जिल्ह्यात उभे असणारे भक्कम किल्ले ह्याची साक्ष देतात.
सिंधुदुर्ग आणि गोमंतकात उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी, तसंच विजापूर येथील सत्तेवर आणि गोमंतकातील पोर्तुगीजांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याच्या दक्षिणेकडील ह्या किल्ल्यांचा वापर केला गेला.

सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे ११ किल्ले नोंदीमध्ये आहेत. भुदरगड हा त्यातलाच एक महत्वाचा किल्ला !
माहित असलेल्या इतिहासाप्रमाणे - शिलाहार राजा भोज (दुसरा) यानं हा किल्ला बांधला. छत्रपती  शिवाजी महाराजांनी इथं नवीन बांधकाम करून किल्ल्याला एका प्रबळ लष्करी ठाण्याचं स्वरूप दिलं. भुदरगडाची मोठ्या प्रमाणात शाबूत असणारी तटबंदी आणि तिच्याखालील ताशीव कडे बघितल्यावर ह्याचा प्रत्यय येतो.
दुर्दैवाने हा गड पुन्हा अदिलशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला.
जिंजी वरून परत येताना छत्रपती राजाराम महाराजांनी काही काळ ह्या किल्ल्यावर वास्तव्य केलं.

भुदरगड किल्ला - विकीमापिया
http://wikimapia.org/#lang=en&lat=16.250420&lon=74.149346&z=15&m=b&search=bhudargad%20fort

कोल्हापूरच्या दक्षिणेस  साधारणपणे ७० कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुण्यापासून अंदाजे सव्वा-तीनशे किलोमीटर.
इतक्या लांबचा किल्ला बघायचा म्हंटल्यावर अनेक योग जुळून यावे लागतात. दोन दिवसांची सुट्टी, इतक्या लांब (बाईक वर) येण्याची तयारी असणारे आणि "किल्ल्यावर काय बघायचं" हा प्रश्न न पडणारे सोबती.
एन एच फोर आणि अपाचे ह्यांचं समीकरण केव्हाचं जुळलेलं ! निखिल आणि त्याची पल्सार सोबतीला.
पहाटे लवकर पुण्याहून निघून संध्याकाळी चहाला भुदरगडावर असा बेत ठरला. वाटेत साताऱ्या जवळची लिंब गावातील 'बारा मोटेची विहीर' बघायचं नक्की केलं. ह्या विहिरीविषयी एक वेगळा लेख इथे लिहिला आहे - 
http://bhushankarmarkarworld.blogspot.in/2016/08/bara-motechi-vihir.html

दुपारी साडेबाराच्या सुमारास कोल्हापुरात पोचलो. 'ओपल हॉटेल' मधलं 'तांबडं-पांढरं' जेवण आणि त्यावर कॅरॅमल कस्टर्ड आणि रबडी !

कोल्हापूर - कागल - गारगोटी - भुदरगड असा प्रवास करून पाच-साडेपाचच्या सुमारास आम्ही किल्ल्यावर पोचलो. गाडीरस्ता वरपर्यंत जात असल्यानं वरती पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी होती. गडाचा माथा सपाट आणि विस्तीर्ण आहे. तुलना करायची झाल्यास विसापूरच्या पठाराशी करता येईल.
भूदरगडाचं  विस्तीर्ण पठार
भुदरगड किल्ल्याची खरी ओळख म्हणजे तिथला दूधसागर तलाव. त्याचं दृश्य बघून मन प्रसन्न झालं.
भुदरगडाचं वैभव - विस्तीर्ण दुधसागर तलाव
पावसाळ्यात पाणी वाहून जाणाऱ्या दगडाच्या खाचेत बांध घालून पाणी अडवलंय. शिवकाळात हा तलाव इतका मोठा नव्हता. इंग्रजांनी तलावाच्या दुसऱ्या बाजूस अजून एक मोठी भिंत बांधून ह्या तलावाचं विस्तृतीकरण केलं आहे. ह्यातील पाणी मात्र पिण्यासाठी अयोग्य आहे. पाण्याला (इथल्या मातीच्या गुणधर्मामुळे?) दुधी रंग आला आहे.

तलाव बघून आम्ही किल्ल्याचा फेरफटका मारायला निघालो. तलावाच्या डाव्या बाजूनं चालत गेल्यावर भवानी मातेचं मंदिरआहे. भवानी मातेची शस्त्रसज्ज मूर्ती विलोभनीय आहे. मंदिराचं वैशिष्ट्य असं कि, मुख्य गाभाऱ्याच्या समोर एक सभामंडप बांधला आहे. जुन्या वाड्यांच्या ओसऱ्या किंवा सज्जा ज्या पद्धतीचे असतात, त्या प्रकारचं ह्याचं बांधकाम आहे. (आपल्या कसबा गणपती मंदिराचा सभामंडप साधारण अश्या प्रकारचा आहे)
मंदिराचा नकाशा (प्रमाणात नाही)
पूर्वीच्या काळी लग्न, मुंज, यज्ञ असे धार्मिक विधी किंवा इतर सामाजिक कार्यक्रम हे मंदिरातच होत असत. मंडपाच्या मधल्या मैदानी जागेत अंदाजे शेकडा माणसे सामावली जाऊ शकतात. लोकांना सामावून घेण्याची गरजच मंदिर आणि त्या समोर बांधलेल्या सभामंडपाच्या रचनेचे कारण असावं. मंदिर आणि सभामंडपाची अशी रचना फार पूर्वीपासून चालत आलेली आहे, आणि आजही गावोगावी बांधल्या जाणाऱ्या मंदिरातून ती आपल्याला दिसून येते.

काही पावलं पुढे गेल्यावर काही समाध्या दिसल्या. त्याच्या पुढे एक विशिष्ट रचनेत बांधलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचा गाभारा जमीन पोखरून तयार केला आहे. वरून पाहता या भागात मंदिर आहे ह्याचा पत्ताही लागत नाही. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर छोटंसं सभामंडप तयार केलेलं आहे.
गाभाऱ्यात अनेक देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत.
पोखरून तयार केलेला मंदिराचा गाभारा
परकीयांच्या हल्ल्यांपासून देवता आणि मंदिरांचं रक्षण व्हावं म्हणून अश्या प्रकारची बांधणी असावी !

काही अंतर चालून गेल्यावर घरांच्या अनेक जोती दृष्टीस पडल्या. पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर असणारे, एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते! एक बैलगाडी जाऊ शकेल इतका रस्त्यांचा विस्तार, आणि त्यांच्या बाजूला घरांची बांधणी. त्या काळातील घरांची रचना अतिशय 'प्लॅनिंग' करून केलेली होती. धोडपच्या सोनारमाची वरील घरांची जोती, अथवा राजगडाच्या बालेकिल्ल्यावरील राजवाड्याच्या जोती, किंवा इतरही किल्ल्यांवरील बांधकामात हे प्लॅनिंग आढळून येतं !
आपल्या शहरातील "पेठा" ह्या अश्याच  बांधकाम रचनेतून जन्मास आलेल्या आहेत.

घरांच्या बाजूलाच एक सुबक बांधणीचं शंकराचं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या डाव्या बाजूला चालत गेलो असता एक छोट्या आकाराचा साचपाण्याचा तलाव लागला.
सुबक बांधणीचं शंकराचं मंदिर. अलीकडे बांधकामाचे चौथरे
तलाव डावीकडे  ठेऊन आम्ही समोर असणाऱ्या तटबंदीवर चढलो. तटबंदीची रुंदी अंदाजे पाच ते सहा फूट, तर उंची अंदाजे दहा फूट आहे. तटबंदीच्या बाहेरील बाजूचा खडक तासून तिची बिकटता अजूनच वाढवलेली आहे.

तटबंदीवरुन फेरफटका मारताना खाली "जानकीपेठ" गाव  दिसत होतं. तटबंदी अखंड नसून मध्ये मध्ये जागा सोडली आहे. ह्या मोकळ्या ठिकाणी पाषाण कडे सरळसोट ३०-४० फूट खोल आहेत. त्यामुळे इथं भक्कम तटबंदीची आवश्यकता वाटली नसावी. ह्या ठिकाणी जुनी कमी उंचीच्या तटबंदीची जोती दिसतात, जी शिवकाळाच्याही पूर्वी उभारण्यात आली असावी असं वाटतं.
फांजीवर चढण्यासाठी पायऱ्या
तटबंदीवरुन फेरफटका मारताना आम्ही किल्ल्याच्या दक्षिण भागात  पोचलो. इथं जानकीपेठ गावातून येणारा कच्चा गाडीरस्ता किल्ल्यावर येतो. ज्या भागातील तटबंदी ढासळली आहे त्या त्या भागात सरकारनं  नवीन भिंत वजा तटबंदी बांधून गडाचं पूर्वीचं रूप परत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

भुदरगडाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरावरही मोठी सपाटी आहे. सध्या तिथं पवनचक्क्या उभारण्यात येत आहेत.
तटबंदीच्या लगोलग चालत गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूला आलो. इथून खाली असणाऱ्या जंगलाचं दृश्य डोळ्याचं पारणं फेडत होतं.



तटबंदीला मध्ये मध्ये बुरुज आहेत. तटबंदीमधे एके ठिकाणी आतील बाजूस एक खोलीसदृश जागा आहे. बहुदा ही पहारेकरांच्या विश्रांतीसाठी बांधलेली खोली, ज्याला 'अलंग' म्हणतात ती असावी. तटबंदीच्या बाजूस कोरड्या पडलेली पाण्याची दोन टाकी दिसली. दोन्ही टाकी दगड खोदून तयार केलेली आहेत. त्यांचा आकार साधारण चौकोनी असून खोली जेमतेम चार फूट आहे. टाक्यांच्या आत उतरण्यासाठी ओबडधोबड पायऱ्या खणल्या आहेत. माझ्या अंदाजानुसार ह्या पाण्याच्या विहिरी नसून, दगडाच्या खाणी असाव्यात. ह्याच दगडाचा वापर करून तटबंदी बांधली गेली असावी,
बारा फुटांपर्यंत उंच असणारी भूदरगडाची तटबंदी. तिथं काम करत असणाऱ्या सफाई कामगारांच्या उंचीवरून तटबंदीच्या उंचीचा अंदाज येऊ शकतो.

कोरड्या पडलेल्या विहिरी/ दगडाच्या खाणी
तटबंदीचा फेरफटका मारून आम्ही पुन्हा दूधसागर तलावापाशी आलो. तिथे एक मस्त जागा बघून तंबू टाकला. सूर्य मावळ्याची वेळ समीप आली होती. बॅग मधून दुर्बीण काढून पळत पुन्हा तटबंदी वर जाऊन बसलो.
अस्ताला जाणारा सूर्य आणि त्यानं आकाशात पसरलेले रंग डोळ्याचं पारणं फेडत होते. दुर्बिणीमधून सूर्यावरील डाग (सौरडाग/सॅन स्पॉट) स्पष्ट दिसत होते. कानावर पडणारा पक्षांचा किलबिलाट आणि अंगाला थंडगार स्पर्श करून जाणारा मंद वारा मनातलं वातावरण प्रसन्न करत होता.

एव्हाना किल्ल्यावर आमच्या खेरीज कोणीच दिसत नव्हतं. लांबवरून किल्ल्याची डागडुजी करणाऱ्या कामगारांचा आवाज ऐकू येत होता. किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या भैरवनाथ मंदिरात त्यांचा मुक्काम असावा.

दिवसभरात साडे तीनशे किलोमीटर बाईकचा प्रवास आणि नंतर इतका सुंदर किल्ला बघून दिवस सार्थकी लागला होता. वाढणाऱ्या अंधाराबरोबरच आकाशातील तारे अधिक ठळक होत होते. रात्री ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाची मेजवानी मिळणार हे नक्की होतं !
परिश्रम करून पेटवलेल्या शेकोटीवर आधी सूप मग म्यागी झालं. शरीरही तृप्त झाल्यावर गाणी ऐकत निवांत पडलो. रात्री दुर्बिणीतून चंद्रावरील विवर, आकाशगंगेचा पट्टा आणि अनेक जुळे-तारे बघितले.

उगवणाऱ्या सूर्याबरोबरच आमची सकाळ झाली.









आवरून तलावाच्या पलीकडे असणारं शंकराचं मंदिर बघितलं. शुष्कसांधी शैलीचं हे मंदिर प्राचीन आहे.

मंदिराच्या छताचा भाग



जवळच असलेलं एक भग्न मंदिर
त्यानंतर भैरवनाथाचं मंदिर बघितलं. मंदिर प्राचीन आहे. मंदिराच्या समोर असणाऱ्या बुरुजावर एक तोफ ठेवली आहे.

मंदिरासमोरील दीपमाळ, शेजारी तोफ
भैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूला राजवाड्याचे अवशेष आणि सदरेच्या जोती शिल्लक आहेत. गडावरील अवशेष, मंदिरे, घरांच्या जोती असे अवशेष बघितल्यावर किल्ला मोठ्या प्रमाणात राबता होता हे जाणवतं.

किल्ला बघून आम्ही किल्ल्यावरून निघालो. खरंतर किल्ल्यावरून पाय निघत नव्हता. अजून एखादी रात्र इथं काढून मग निघावं अशी इच्छा होत होती. प्रत्येक क्षणाला जॅकपॉट लागल्याप्रमाणे आनंद देणारे ट्रेक फार थोडे असतात !

भुदरगडावरून आमची स्वारी निघाली गगनगडावर ! गूगल मॅप राधानगरी ते गगनगड असा एक रस्ता दाखवत होता. पण तिथे गेल्यावर समजलं कि हा फारच कच्चा रास्ता आहे.
त्या क्षणाला गूगल मॅप वरचा विश्वास कमी झाला. कारण मागल्या वेळेस पारगडला जातानाही गूगलनं आमची अशीच फजिती केली होती.


रस्ता शोधत, घाटवाटांवरून रास्ता नेईल तिथे आणि असेल तश्या रस्त्यावर गाड्या मारत दुपारी बाराच्या सुमारास गगनगड गाठला.
घाटमाथ्यावरून कोकणच्या दिशेनं बाहेर आलेलं एक टोक म्हणजे गगनगड आहे !
किल्ल्याच्या उत्तरेकडून भुई बावडा घाट, तर दक्षिणेकडून करूळ घाट खाली कोकणात उतरतो. पूर्वीपासून वापरात असणाऱ्या आणि कोकणातील मालवण भागातील बंदरांकडे घेऊन जाणाऱ्या ह्या महत्वाच्या घाटवाटा. अश्या मोक्याच्या जागेवर किल्ला नसेल तरच नवल !
गगनगड स्थान
गगनगड हे पु. गगनगिरी महाराजांचे निवासस्थान होतं. रविवार असल्यानं इथं भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. गगनगिरी महाराजांची गुहा तसेच काही मंदिरं किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात आहेत. अजून काही पावले चालत पुढे गेल्यावर बालेकिल्ला आहे.
किल्ल्याचा विस्तार फार मोठा नाही. किल्ल्यावर एक विहीर आणि तटबंदीच्या चार दगडांखेरीज बघण्यासारखंही काही नाही. किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागात एक छोटंसं माचीसदृश बांधकाम आहे. माचीच्या तत्बंदीच्या जोती नजरेस पडतात.
दुपारच्या कडक उन्हात, अनवाणी हिंडत, तळपायाला चटके सोसत किल्ला बघितला. अश्या वेळेस एकही फोटो काढायला जमलं नाही ह्याची खंत मनात सलतीये.

अडीच वाजता गाड्या कोल्हापूरच्या दिशेनं निघाल्या. चार वाजता कोल्हापुरात चहा झाला. तिथून एन एच फोर वर रमत गमत रात्री सडेनऊ वाजता आम्ही पुण्यात पोचलो.

महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या आणि इतिहासातील अनेक घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या भुदरगडाला शतश: नमन _/\_

*सर्व फोटो श्रुती आणि निखील कडून साभार.

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...