Showing posts with label Forts. Show all posts
Showing posts with label Forts. Show all posts

Wednesday, May 24, 2023

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

 


    कळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजही टिकून आहे. गेली जवळपास पंचवीस वर्षे एक-एक करत गडकोट बघत आलो आहे आणि आज इथपर्यंत येऊन पोचलो आहे.

सुरुवातीला केवळ महाराजांविषयी आदर आणि आपुलकी म्हणून गडकोट फिरायला सुरुवात केली. त्यावेळी फारश्या नोंदीसुद्धा केल्या नाहीत. पण हळू हळू समजू लागलं की प्रत्येक किल्ला हा वेगळा आहे. त्याची रचना, त्याचा उपयोग, त्याचा इतिहास वेगळा आहे.
मग मात्र सुरुवात झाली ते गडकोटांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करण्याची. गडाचे नाव, जिल्हा, उंची, त्यावरील विशेष रचना, गूगल लोकेशन इत्यादी माहितीची नोंद करण्यास सुरुवात केली. पूर्वी पाहून झालेले गडकोट परत परत जाऊन बघितले.

खरंतर शंभर, दोनशे, अडीचशे असे आकडे कधीच मनात ठेवले नाहीत. पण यादी जशी १७५ - १८० च्या पुढे जाऊ लागली, तेव्हा जाणवू लागलं की आज खूप लांबवर आलो आहे. मागे वळून बघताना असंख्य आठवणी सोबत जोडत आलो आहे.
कधी किल्ल्याचं अस्तित्व झाडाझुडुपात शोधून काढायला लागत आहे, तर काही भव्य किल्ले अनेक दिवस मुक्काम केला तरी पूर्ण बघून झालेले नाहीत. काही किल्ले म्हणजे केवळ नावाला शिल्लक आहेत. त्यावर एखादा बुरूज किंवा एखादी गुहा किंवा पाण्याचे टाके इतकेच काय ते अवशेष शिल्लक! पण तेही किल्ले तितकेच महत्त्वाचे!

कारण "किल्ला बघणे" हे केवळ तिथल्या तटाबुरूजाला हात लावून परत येणे नव्हे. किल्ला बघायची सुरुवात होते त्या किल्ल्याची प्राथमिक माहिती आणि इतिहास काढण्यापासून. मग त्याच्या भेटीचे प्लॅनिंग, सहकारी जमा करणे, प्रवास, मुक्काम आणि इतर बऱ्याच निगडित गोष्टी. किल्ल्यावर भटकताना आलेले अनुभव, तिकडे असणारे कोड्यात टाकणारे बांधकाम, ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केली की एक एक गड म्हणजे एक एक अनुभव होऊन जातो.

गडकिल्ल्यावरील बुरुजाच्या दगडाला नुसता हात लावला तरी विलक्षण ऊर्जा जाणवते. किल्ल्यात प्रवेश करताच भोवतालाचे तटबुरुज स्वागत करतात. किल्ल्यावर वावरताना एक क्षण डोळे बंद करून मी नेहमी कल्पना करतो - ह्या किल्ल्याच्या परमवैभवाच्या काळात तो कसा असेल?

मग दिसू लागतात दरवाजाच्या आतल्या देवड्यांत गस्तीला बसलेले पहारेकरी. तटाच्या छोट्या कोनाड्यात लावलेल्या पणत्या आणि दिवे. बुरुजांच्या फलिकांमध्ये सुसज्ज तोफा. दरवाज्यातून आतबाहेर करणाऱ्यांच्या होत असणाऱ्या नोंदी. धान्याने भरलेली कोठारे, हे तर कोणाचे तरी घर असावे, हे इथे स्वयंपाकघर, इकडे देवघर, हा व्हरांडा, समोर तुळशी वृंदावन, हे पाणी साठवायचे दगडी भांडे, हि सांडपाणी वाहून जायची वाट, त्या तिकडे पायऱ्या असणारी विहीर. हे शंकराचं मंदिर, हा सभामंडप आणि हा गाभारा. त्या उंचवट्यावर असणाऱ्या वाड्यात किल्लेदार राहत असावा. हे त्याचं खासगी पाण्याचं टाकं. हि सदर, आणि हे समोर उभे असलेले अधिकारी.

कल्पना केली तरी किती विलक्षण वाटतं. प्रत्येक किल्ला म्हणजे एक वेगळंच विश्व. हा सह्याद्री अफाट आहे, तो आणि त्यावर बांधलेले सगळे किल्ले बघून व्हायला अनेक आयुष्य कमी पडतील. जितकं काही बघून झालंय, मी त्याची नोंद करत आलो आहे, जमेल तितके फोटो काढत आलो आहे. महाराष्ट्र शिवाय गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेशातील किल्लेही बघत आलो आहे.
गड किल्ल्यांच्या रचनेबाबत आज थोडंफार कळत आहे. क्वचित वेगळं बांधकाम बघून कोड्यातही पडत आहे! कधी पडलो, कधी रडलो, कधी दमलो, कधी भांडलो सुद्धा आहे! अनेकांची साथ आणि सहकार्य घेत आलो आहे. सोबत नसेल कोणी तर क्वचित एकटा सुद्धा भटकून आलो आहे.
गोनीदा, प्र. के. घाणेकर, महेश तेंडुलकर यांची पुस्तके आणि डॉ. सचिन जोशी सरांशी मारलेल्या गप्पा आणि मार्गदर्शन, त्यामुळे किल्ले अभ्यासपूर्ण बघण्यासाठी मदत झाली.

सहकार्य, प्रोत्साहन आणि साथ दिलेल्या सर्व मित्रांचा मी ऋणी आहे. काही वेळेस मित्रांना केवळ माझ्या हट्टापायी निवांत कोकण ट्रीप ऐवजी गडकिल्ल्यावर तंगडतोड करावी लागली आहे. ट्रेकला गेल्यावर काळजी करणाऱ्या आईचा मी ऋणी आहे. माझी धडपड सांभाळून घेणाऱ्या रौद्र सह्याद्रीचा मी ऋणी आहे. ज्यांच्यशिवाय हे अशक्य होतं त्या माझ्या अपाचेचा आणि केटीएमचा मी ऋणी आहे. अनेक गावात चांगले रस्ते नाहीत, तिथे ह्या गाड्यांना पर्याय नाही. लांबच्या पल्ल्यांना माझ्या wrv ची सोबत होती, तिचाही ऋणी आहे. जिच्यासोबत हे सर्व शक्य झालं, अश्या बायकोचा मी खूप ऋणी आहे! थोडा भाग्यवानही आहे कारण तिलाही गडकोटांची भटकंती प्रचंड आवडते. (श्रुती @ १९८).

२५० गडकोट बघून झाले ह्या गोष्टीची जाहिरात करायची अजिबात इच्छा नाही. पण कदाचित लोकांना प्रेरणा मिळेल म्हणून लिहितो आहे. दैनंदिन काम आणि जबाबदाऱ्या सांभाळून इतकी भटकंती करणे सोपे नाही. पण ध्यास असेल तर हे अशक्यही नाही हेच सांगायचं आहे.
माझी गडकोटांची भटकंती अशीच पुढे चालू ठेवणार आहे. बऱ्याच किल्ल्यांची माहिती आज जालावर आणि पुस्तकांत सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे माझ्याकडे साठलेल्या माहितीच्या आधारे एखादे पुस्तक लिहिण्यापेक्षा, त्यावर विश्लेषण करून काही उपयुक्त माहिती किंवा संशोधन समोर येते का असा माझा पुढे प्रयत्न राहील.

धन्यवाद,

भूषण करमरकर

Monday, December 7, 2020

२०० किल्ल्यांच्या निमित्ताने - आठवणींचं कोलाज

  राजगडाच्या केवळ दर्शनाने पाणवणाऱ्या डोळ्यांच्या कडा.. त्याच्यावरील असंख्य आठवणी ..पैकी कोणती आठवण छान आणि कोणती सर्वात छान अशी नेहमीचीच तुलना. संजीवनीवरचा स्वर्गीय सूर्यास्त ! त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी केलेल्या राजगडाच्या असंख्य वाऱ्या.

तोरण्याच्या बुधल्या शेजारी अस्ताला जाणारा सूर्य. त्या प्रचंडगडाच्या सावलीची ठळक झालेली सीमा... आणि मनामध्ये सुरू झालेला "तव तेजांतील एक किरण दे ।" असा जप ...

मढे घाटातली ती दोघातच काढलेली अंधारी रात्र. घाटाच्या अगदी कडेला टाकलेला तंबू. ताऱ्यांनी गच्च भरलेलं नेत्रदीपक आकाश, त्याला मधोमध छेदणारा आकाशगंगेचा धूसर पट्टा. खाली जंगलातून मधूनच ऐकू येणारा रान डुकरांच्या व्हीव्हळण्याचा आवा आणि तो ऐकून अंगावर आलेला काटा. तंबूच्या बाहेर मांडलेला टेलिस्कोप, त्यामधून दिसणारे अनेक तारकापुंज, गुरुवरील पट्टे आणि शनीची कडी....

उघड्यावर झोपून, कुडकुडत काढलेली कमळगडावरची गोठवणारी रात्र. मध्यरात्री चार पायऱ्या उतरून त्या कावेच्या खोल विहिरीत जाण्याचा मोह. अष्टमीच्या चंद्राच्या तेजस्वितेला न जुमानणाऱ्या ताऱ्यांनी खचाखच भरलेलं आकाश. चंद्र मावळेल तसं आपलं अस्तित्व स्पष्ट करणारा आकाशगंगेचा पट्टा. संपूर्ण आकाशात आपली सत्ता गाजवणारा तो वृश्चिक आणि त्याच्या शेपटाला लटकवलेले दोन तेजस्वी तारकापुंज…उघड्या जमिनीवर आडवं पडून रात्रभर बघितलेला हा अवकाशातील खेळ !

निवती, यशवंतगड, सिंधुदुर्ग बघण्यासाठी संपूर्ण रात्रभर दामटवलेली अपाचे... गाडीच्या उजेडात चमकणारे आणि भरभर मागे जाणारे रस्त्यावर आखलेले पांढरे पट्टे.
पहाटे घेतलेलं अंबाबाईचं अभूतपूर्व दर्शन. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि माझ्यावर रोखलेली तिची नजर… भोगवे किनाऱ्यावर आतमध्ये ओढून नेणाऱ्या समुद्रात सावधपणे केलेला धिंगाणा, आणि अखेर निवतीच्या किल्ल्यावर काढलेली नवचेतना देणारी सुखद रात्र !

NH-४ वर अपाचे सुसाट पळवताना ११४ वर थरथरणारा स्पीडोमीटरचा काटा ! दिवसभर गाडी चालवून, समोर ठाकलेलं वाहून गेलेल्या रस्त्याचं आव्हान ! मावळत्या सूर्यासोबत पारगडाच्या भेटीची मावळत जाणारी आशा आणि वाढत्या अंधारासोबत गडद होणारी भीती ! दुसऱ्या रस्त्याने जाऊन पारगड दृष्टिक्षेपात येताच अंगात संचारलेली नवी ऊर्जा, आणि अखेर अजिंक्य राहिलेली त्याच्या भेटीची जिद्द !
पारगडावर पोचल्यावर तिथल्या घनदाट जंगलात आणि खोल दऱ्यात मावणार नाही इतका अपार आनंद !
आणि ह्यासोबत दिवसभरात अपाचे वर बसून कापलेलं ४७० किलोमीटरचं अंतर !

हट्टास पेटून "पुणे-जिंजी-पुणे" केलेली अपाचे वारी ! राजागिरी वरती पोचल्यावर मिळालेलं अपार समाधान..आणि खाली उतरताना माकडांनी दिलेला त्रास !

सुधागड समजून त्याच्या शेजारच्याच डोंगरावर केलेली "यशस्वी "चढाई ! वर पोचल्यावर आलेली निराशा, पण समोरच्या सुधागडच्या बुलंद बुरुजाचे लांबून दर्शन होताच मनात संचारलेली नवी उमेद !

मंगळगडावर रान तुडवीत केलेली चढाई.. समोर काही उंचीवर, भेटीस मन:पूर्वक आमंत्रण देणारा त्याचा पश्चिमेकडील बुरूज, पण सहा फूट उंच गवतात हरवलेली पायवाट…अवघड ठिकाणी केलेले चढाईचे असफल प्रयत्न... वेळे अभावी परत फिरायची आलेली परिस्थिती, गळ्यात अडकलेला आवंढा आणि इतक्या जवळ येऊनही मंगळगड लांब राहिल्याने मनाला लागलेली हुरहूर !
काही दिवसातच मंगळ गडाची केलेली यशस्वी मोहीम, त्यावर तंबू ठोकून काढलेली रात्र, आणि सोबतीला ग्रहण लागलेला चंद्रमा !

इंद्राई वरती गॅस सिलेंडरमुळे झालेली फजिती, त्यानंतर अचानक दाटलेला काळोख, धुव्वाधार पाऊस आणि अंधारात चुकलेली वाट ! तंत्रज्ञानाचा वापर करीत, तुफानी पावसाचा मार झेलत शोधलेली वाट आणि टाकलेला निश्वास !

माघ वद्य नवमीच्या रात्री दर वर्षी सिंहगडाला दिली जाणारी भेट, तान्हाजींच्या स्मारकासमोर म्हटलेली सांघिक पद्य ! तान्हाजींच्या पराक्रमाच्या जागवलेल्या आठवणी आणि मनात आलेला भावनांचा महापूर !

यादी जशी १७५ - १८० च्या पुढे जाऊ लागली, तेव्हा जाणवू लागलं कि आज खूप लांबवर आलो आहे. आजपर्यंत दोनशेहून अधिक गड किल्ले 'अभ्यासपूर्ण' बघून झाले. संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आज गेली वीस बावीस वर्षे टिकून आहे.
कधी किल्ल्याचं अस्तित्व झाडाझुडूपात शोधून काढायला लागत आहे, तर काही भव्य किल्ले अनेक दिवस मुक्काम केला तरी पूर्ण बघून झालेले नाहीत..
किल्ला बघून झाल्यावर त्याची नोंद करत आलो आहे, जमेल तितके फोटो काढत आलो आहे.
महाराष्ट्र शिवाय गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेशातील किल्लेही बघत आलो आहे.
गड किल्ल्यांच्या रचनेबाबत आज थोडंफार कळत आहे. क्वचित वेगळं बांधकाम बघून कोड्यातही पडत आहे.

कधी पडलो कधी रडलो, कधी दमलो कधी भांडलो सुद्धा आहे ! मागे वळून बघताना असंख्य आठवणी सोबत जोडत आलो आहे.
अनेकांची साथ आणि सहकार्य घेत आलो आहे. सोबत नसेल कोणी तर एकटा भटकून आलो आहे.
सहकार्य, प्रोत्साहन आणि साथ दिलेल्या सर्व मित्रांचा
ट्रेकला गेल्यावर काळजी करणाऱ्या आईचा
माझी धडपड सांभाळून घेणाऱ्या रौद्र सह्याद्रीचा
जिच्याशिवाय हे अशक्य होतं त्या 'अपाचे' चा
आणि
जिच्यासोबत हे शक्य झालं, अश्या बायकोचा मी खूप ऋणी आहे ! (श्रुती @ १५८ किल्ले)

-भूषण
http://bhushankarmarkarworld.blogspot.com/
https://puneastro.in/







Friday, October 11, 2019

मोरगिरी - सुखद अनुभव ! - Morgiri

पाचे आज पुन्हा मृगगडाच्या वाटेवर होती. मृगगडावर मी अगदी महिन्याभरापूर्वीच जाऊन आलो होतो. पण आजची फेरी श्रुती (बायको) साठी होती. आम्हाला दोघांनाही गड-किल्ले भ्रमंतीची आवड असल्यानं आमच्यात एक अलिखित नियम पडला आहे. जर मी एखादा किल्ला तिच्याशिवाय बघितला, तर तिच्यासोबत तो पुन्हा बघायचा. आणि मलाही आवडतं हे. आपले किल्ले आहेतच असे. पुन्हा पुन्हा जावसं वाटणारे !

NH४ वरती अपाचे पळत होती. कामशेतचा तो छोटा घाट पार केला तसा डावीकडील भातराशीच्या मागून आभाळात घुसलेला डोंगराचा एक सुळका डोकावू लागला.

मोरगिरी !

प्रत्येक वेळेस तिथून जाताना तो खुणावत असतो. आजही त्यानं साद घातली.

"श्रुती, मोरगिरी. व्हायचाय आपला."
"जायचं का?"
"चला लगेच. तसंही मी परवाच डिटेल्स काढून ठेवलेत."

मृगगडाची मनातल्या मनात माफी मागून गाडी लोणावळ्यातून डावीकडे वळवली.
मोरगिरी तसा अल्पपरिचित किल्ला. थोड्या अवघड श्रेणीतला. त्यामुळे गर्दीची लागण ह्या किल्ल्याला झालेली नाही.
लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगड ह्या किल्ल्यांवर मी अनेक वेळेस आलोय. दर वेळेस मोरगिरीचा हा डोंगर साद घालायचा. कोराईगडावरून बघितल्यावर ह्या डोंगरानं तुंगला ग्रहण लावलेलं दिसतं.
काही वर्षांपूर्वी शाखेतील एका शिक्षकांना ह्याबद्दल विचारलं तेव्हा समजलं कि हा डोंगर म्हणजे मोरगिरी नावाचा किल्ला आहे.

इतक्या जवळ, पण इतका अपिरिचित !

२०१५-१६ च्या सुमारास साईप्रकाशच्या ब्लॉग मध्ये ह्याबद्दल चांगली माहिती मिळाली. गेल्या दीड एक वर्षांपासून ट्रेकक्षितिज वरही मोरगिरीची चांगली माहिती समाविष्ट केलेली आहे.
हिमांशू सोबतही बोलणं झालं होतं. तो नुकताच जाऊन आला होता. त्यानं दिलेली माहितीची शिदोरीही सोबत होतीच.

जांभुळणे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. गावाच्या बुद्धवस्तीपाशी गाडी लावली. अनिल आणि राम ह्या गावातल्या छोट्या पोरांनी आम्हाला रस्ता दाखवला. पंधरा-वीस मिनिटांच्या चढाई नंतर आम्ही एका विस्तीर्ण पठारावर आलो.
मोरगिरी म्हणजे ह्या विस्तीर्ण पठारावर साधारण मध्यभागी असलेला एक उंच कातळ. आमच्या जागेपासुन तो फार लांब अंतरावर दिसत होता. इथून किल्ल्यापर्यंत कसं जायचं ते सांगून अनिल आणि राम मागे फिरले.

पठारावर आल्यावर लांबवर असणारा मोरगिरी !
त्या प्रचंड पसरलेल्या पठारावर आता आम्ही दोघंच होतो. अधून मधून धुकं येऊन वातावरण अजून गूढ करत होतं. ट्रेक-क्षितिज वर मोरगिरी हा कठीण श्रेणीतील किल्ला असं नमूद केलं आहे, आणि त्यांनी दिलंय म्हणजे नक्कीच असणार !
आज खूप दिवसांनी अश्या आडवाटेवरच्या किल्ल्यावर येणं झालं होतं.
भोवतालच्या ह्या वातावरणामुळे मनात थोडी चलबिचल होती. असं गूढ वातावरण मी बऱ्याच वेळेस अनुभवलं आहे. पण सोबत तीन-चार जणांचा ग्रुप असेल तर त्याचं दडपण येत नाही. आज मात्र आम्ही दोघंच.
मध्येच मला बाई-माणसांच्या गप्पांचा पुसटसा आवाज ऐकू येत होता. लांब लांब वर कोणीच नव्हतं. किल्ला जवळपास दीड-दोन किलोमीटर अंतरावर होता. हे पठाराची बऱ्यापैकी उंचीवर होतं. त्यामुळे एकतर ह्या आवाजाचा मला भास होत होता, किंवा वारा कुठूनतरी लांबून हा आवाज माझ्यापर्यंत घेऊन येत होता.
श्रुतीला हे सांगून उगाच तिची भीती मी वाढवली नाही.

तसा ह्या किल्ल्याच्या आजूबाजूचे डोंगर आणि परिसर माझ्या परिचयाचा होता. आज मात्र निसर्गासोबत नीट कनेक्ट होत नव्हतं.

पावलं भरभर टाकायला सुरुवात केली.

"काय रे .. होईल ना? कुठच्या कुठंय बघ किल्ला अजून.."
"होणार होणार ... चल भरभर"
शक्य तितक्या लवकर त्या सुळक्याच्या पायथ्याशी पोचायचं असा बेत होता.

त्या पठारावरून आम्ही डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत साधारण वीसेक मिनिटं चाललो. वाट अगदी सरळ सपाट होती. आता किल्ला डावीकडे आला होता. ते पठार मात्र उजवीकडे 'कैच्याकै' लांबपर्यंत पसरलं होतं.


आता फक्त इतकी चढाई बाकी !

आम्ही वरती चढायचा मार्गच शोधात होतो. तितक्यात समोर थोड्या अंतरावर गावातली काही मुलं दिसली. तेव्हा खूप बरं वाटलं. चलबिचल, भीती, काळजी सगळं एका क्षणात गायब ! हातापायात नवा त्राण शिरला.

माणसाला माणसाची सोबत किती महत्वाची आहे !




त्या मुलांना पुढच्या चढाईचा रस्ता विचारला. इथून पुढे त्या कातळावर चढाई सुरु ! सुरुवातीला दाट जंगलातून, आणि पुढे कारवीच्या झुडुपातून वाट भरभर वर चढत गेली.


पावलागणिक उंची वाढत होती. पावसाळा असल्यानं माती ओली होती. त्यामुळे चांगली पकड मिळत गेली. उन्हाळ्यात मात्र इथे प्रचंड घसारा असणार, आणि हाच चढ अधिक धोकादायक होणार ह्यात शंका नाही. उन्हाळ्यात इथे येणं टाळावं.
वाटेत एक दोन ठिकाणी सात-आठ फुटांचे अवघड टप्पे लागले. हे सर्व पार करून आम्ही गडमाथ्याच्या अगदी जवळ पोचलो होतो.
इथे काही चपला दिसल्या. ह्याचा अर्थ वर अजून लोक आहेत.
अरे हो, आज नवरात्रातील अष्टमी !
आम्ही पण आमची पादत्राणे इथेच सोडली. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला खडकात पाण्याचं टाकं दिसलं. ते पूर्ण भरून ओसंडून वाहत होतं.

काही मिनिटात आम्ही 'जाख'-देवीच्या ठाण्यात पोचलो. तांदळाच्या रूपात असलेली हि जाखदेवी ह्या भागातील लोकांची कुलस्वामिनी.
देवीचं ठाणं म्हणजे कातळात खोदलेली, अंदाजे पाच बाय सहा फूट इतकी छोटीशी गुहा आहे. ह्याच गुहेत एक पाण्याचं टाकं आहे. एका शेजारी एक अशी जेमतेम पाच-सहा मंडळी बसतील इतकीच गुहेच्या बाहेर जागा. समोर तीनशे फुटांचा थेट ड्रॉप !

देवीचं मनोमन दर्शन झालं, चांगभलं रे देवा चांगभलं !

तिथेच मांडून ठेवलेला खोबऱ्याचा प्रसाद घेतला. गावातील काही मंडळी देवीच्या दर्शनाला आलेली होती. सर्वांसोबत तोंडओळख झाली.
पठारावरून चालत असताना ह्यांच्याच गप्पांचा आवाज मला ऐकू येत होता.

देवीच्या गुहेशेजारीच वर जाण्यासाठी पाच-सात फुटांची छोटी शिडी लावली आहे. पूर्वी हि शिडी नव्हती, त्यामुळे हा पॅच अधिकच कठीण होता. शिडीवरून जाताना पाठमोरी बघितलं तर डोळे चक्रावतील अशी खोल दरी !


अगदी थोडक्या जागेत उभी असणारी मंडळी. तिथेच डाव्या बाजूला देवीचंठाणं आणि समोरच्या कातळ भिंतीवर शिडी आहे.

शिडीमुळे आम्हा गरिबांची सोय झाली. नाहीतर शक्य वाटत नव्हतं. शिडी चढून गेल्यावर पुढे खोदीव पायऱ्या लागल्या. त्या पार केल्या आणि आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोचलो !
गडमाथ्याचा विस्तार अगदी थोडका. वरती पाण्याचं एक टाकं आणि बांधकामाचे काही अवशेष विखुरलेले होते.
किल्ल्याचा उपयोग मुख्यत: जवळच कोकणात उतरणाऱ्या पायमोडी घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा.
माथ्यावरील पाण्याचं टाकं
पूर्वीच्या काळी ह्या किल्ल्यांवर लोक कसे रहात असावेत ह्याची आपण केवळ कल्पना करावी.. मोरगिरी काय, कोकणदिवा काय.. इतरही काही किल्ले... इतकीशी टीचभर जागा तिथं. असे किती लोक मुक्कामी असावेत?
शक्य नाही वाटत. पण ते सत्य आहे. ते बांधकाम, ती पाण्याची टाकी, खोदीव पायऱ्या.. कोणी बांधलं हे सगळं?
आजूबाजूच्या किल्ल्यांवर चमकणाऱ्या मशालींच्या उजेडानीही किती धीर मिळत असेल त्यांना !

इथून दिसणारं दृश्य मात्र खरोखर मन मोहून टाकणारं होतं.


परम पवित्र भगवत ध्वज की जय !

कातळ चढताना खाली पसरलेलं पठार

पावना धरणाचे दृश्य !

समोरच असणारा तुंग किल्ला आणि अलीकडला किल्ल्यासादृश  भासणारा डोंगर.


जांभूळणे गावातून किल्ल्याचा मार्ग दिला आहे.

हेच ते शिखर जे इतकी वर्ष NH४ वरून जात येता खुणावत होतं. आज आम्ही त्या शिखरावर पोचलो!
आज मोरगिरीला भेटलो.
समोर तुंग अक्षरश: ठेंगणा दिसत होता. त्यामागे लोहगड, विसापूर, भातराशी, उजवीकडे तिकोना, मागे कोरीगड असे किल्ले नजरेस पडत होते.

हे सगळं सगळं मनात साठवून, किल्ल्यावरचे ते काही क्षण सोबत घेऊन आम्ही निघालो. पुन्हा देवीच्या ठाण्यापाशी आलो. सोबतच तिथे आलेली मंडळी निघाली. पटपट उतरत पंधरा मिनटात आम्ही पठारावर पोचलो सुद्धा ! इथून सर्व मंडळी आपल्या वाटेने निघाली. किल्ल्यावर येण्यासाठी अजूनही एक वाट प्रचलित आहे. ती लोकं तिकडून आली होती.
आम्ही आमच्या वाटेनं निघालो.

पुन्हा लांबवर पसरलेलं ते पठार. पण आता भीती पेक्षा त्या जागेबद्दल एक आपुलकी निर्माण झाली होती. मनात मोरगिरी बघितल्याचा अपार आनंद ! आणि आम्ही खऱ्या अर्थानं त्या निसर्गाशी एकरूप झालो होतो ! परतीच्या वाटेवर कणभरही भीती वाटली नाही. भरपूर फोटो काढले. पठारावर काही क्षण निवांत बसून घालवले. काही वेळात खाली उतरलो.

एक थरारक पण उत्साहवर्धक अनुभव घेऊन.




किल्ले भ्रमंतीचा पुरेसा अनुभव सोबत असेल तर किल्ला खूप अवघड नाही. तरीसुद्धा जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. 
जाण्यासाठी उत्तम कालावधी - ऑक्टोबर, नोव्हेंरपर्यंत. नंतर घसारा वाढून चढाई उतराई अवघड होण्याची शक्यता आहे.

Leave nothing but footprints. Take nothing but memories.

Sunday, March 26, 2017

कलानिधीगड (कलानंदीगड) - Kalanidhigad (Kalanandi gad)

      गड किल्ल्यांना परमोच्च महत्त्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. महाराजांनी योग्य जागा हेरल्या. मोक्याच्या जागेच्या आजूबाजूच्या डोंगरावर बुरूज-तटबंदीचा शेला पागोटा चढवून किल्ल्यांची उभारणी केली.
रामचंद्रपंत अमात्य विरचित आज्ञापत्रात महाराजांचे किल्ल्यांविषयी असलेले विचार प्रकट होतात. त्यात म्हटलंय - "राज्यरक्षणाचें मुख्य कारण किल्ले, देशोदेशी स्थळे पाहून बांधावे."

कोल्हापूर जिल्ह्यातला कलानिधीगड हा असाच एक देखणा किल्ला. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. सिंधुदुर्ग आणि गोमंतकात उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी.


कालिवाडे गावातून कलानिधीगड
गड कसा असावा आणि त्याच्या रचनेसंदर्भातील कागदोपत्री वाचलेली माहिती मी ह्या किल्ल्यावर अगदी यशस्वीपणे पडताळून पहिली. किल्ले फक्त बघण्यापेक्षा ते समजून घ्यायला खूप जास्ती मजा येते !
रामचंद्रपंत अमात्य ह्यांनी गड बांधणीबाबत आज्ञापत्रात नमूद केलेल्या 'सूचना' हा किल्ला बांधणाऱ्या स्थापत्यवीराने तंतोतंत पाळल्या आहेत. कलानिधीगडावर ह्याची चटकन जाणीव होते ह्याचं कारण गड विस्ताराने लहान आहे, आणि इतक्या कमी जागेत किल्ल्यावर आवश्यक अश्या सर्व प्रकारच्या इमारती उभारल्या आहेत. हे एक प्रकारचं 'चॅलेंज' म्हणावं लागेल. कोणती इमारत कुठे असावी हे सुद्धा आज्ञापत्रातील उल्लेखाला अनुसरून आहे. लेखात मी त्या गोष्टींचा पडताळा नमूद करणार आहे.

बेळगाव-आंबोली रस्त्यावर बेळगाव पासून अंदाजे २५ किमी अंतरावर कालिवडे हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे. गडावर पायी जाण्यासाठी सध्या कालिवडे गावातून जाणारी पायवाट वापरात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रॅक्टर जाईल असा अजून एक कच्चा दगडी रस्ता सुद्धा काढला आहे. हा गडाला लांबची फेरी मारून वरती येतो. आम्ही ह्या दगडी रस्त्यानं न जात पायवाट पकडली आणि किल्ला चढायला सुरुवात केली.

वाटेत खंडोबाचं (कि एखाद्या वीराचं?) उद्ध्वस्त मंदिर आणि मूर्त्या दिसल्या. चढताना मध्येच मुख्य पायवाट सोडून दुसऱ्या कमी रुळलेल्या वाटेनं गेल्यामुळे मंदिराचे हे अवशेष बघायला मिळाले.


वाटेमध्ये असलेली वीराची मूर्ती

गडाचा दरवाजा गाठायला अंदाजे दीड तास लागला. सुस्थितीत असणारा हा दरवाजा खरंतर गडाचा दुसरा दरवाजा आहे. ह्याचं कारण किल्ला फिरताना आम्हाला भग्न झालेला गडाचा मुख्य दरवाजा दिसला, जो दुसऱ्या दिशेला आहे.
ह्या सुस्थितीत असणाऱ्या दुसऱ्या दरवाज्याची रचना गोमुखी म्हणता येणार नाही. जागेअभावी दरवाज्यास गोमुखी पद्धतीनं बांधणं शक्य झालं नसावं. पण दरवाजा एका सशक्त बुरुजाच्या मागे लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. दरवाज्याच्या डावीकडील बुरूज त्याला बरोबर कवेत घेतो. (वर्धनगडाची चोर दिंडी अगदी ह्याच पद्धतीनं बांधली आहे). 
आज्ञापत्रात पंत म्हणतात-
"दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून, पुढे बुरूज देऊन, येतिजाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, यांकरिता गड पाहून, एक दोन तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यांमध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या"


गडाचा सुस्थितीत असणारा दरवाजा, उजवीकडील बुरुजामध्ये तोफ डागण्याची जागा आणि जंग्या दिसत आहेत
दरवाज्याची रचना - वर येणारी पायवाट बुरुजांच्या कुशीतून किल्ल्यात प्रवेश करते

दरवाज्यातून आत आल्यावर मागील बाजूस फांजीवर जाण्यास बांधलेल्या पायऱ्या दृष्टीस पडतात.

दरवाजा आतील बाजूने
दरवाज्याकडे पाठ करून उभं राहिल्यास उजवीकडील तटबंदी गडाच्या पश्चिम टोकापर्यंत शाबूत आहे. ह्याच ठिकाणी डाव्या हाताला एक लांबलचक भिंत बांधली आहे. जी गडाच्या दक्षिण टोकाच्या तटबंदीला जाऊन मिळते. ह्या भिंतीची जाडी अंदाजे सव्वा मीटर तर लांबी जवळपास सत्तर मीटर आहे(जीपीएस मेझरमेन्ट). ही भिंत तटबंदी नाही, तर किल्ल्यावरील सपाट प्रदेशाचे दोन भाग करण्यासाठी आहे (ज्याला आपण मराठीत 'पार्टिशन वॉल' म्हणतो).
अशी भिंत बांधायचं प्रयोजन आणि त्या संदर्भातील आज्ञापत्रातील उल्लेख लेखामध्ये पुढे देतो आहे.
गडाची विकीमापिया इमेज
सध्या ह्या भिंतीला मध्येच खिंडार पाडून एक लोखंडी दार बसवलं आहे. ह्या लोखंडी दारातून प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्वेकडील विभागात प्रवेश करतो. समोरच बीएसएनएलची चौकी आहे. चौकीत कालिवडे गावातील दोन व्यक्ती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम पाहतात. ह्या चौकीच्या शेजारी टॉवर उभारला आहे.
इथून डाव्या बाजूनं पुढे गेल्यावर दारुकोठार आहे (नकाशा बघावा). एके ठिकाणी ह्याचा उल्लेख वाडा म्हणून आलेला आहे. परंतु मला हा वाडा किंवा कोणाच्या राहण्याची जागा वाटत नाही. हे दारुकोठार किंवा युद्धसामग्री संबंधातील एखादं बांधकाम असावं. ह्याचं कारण लेखात मी पुढे दिलं आहे.
ह्याच दिशेनं पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्व टोकावरील बुरुजावर येतो. ह्या ठिकाणावरून कालिवडे गावातून येणारी पायवाट दृष्टीस पडते.
तटबंदी डावीकडे ठेवत गडाच्या दक्षिण दिशेला चालत राहिल्यावर आपल्याला त्या काळी बांधण्यात आलेलं शौचकूप (संडास) दृष्टीस पडतं. गडाच्या तटबंदीला अगदी चिकटून ह्याचं बांधकाम आहे (तटबंदीची भिंत दोन्हीमध्ये 'कॉमन' आहे). असे अजून तीन शौचकूप ठराविक अंतरावर दिसतात. लोहगड, सिंधुदुर्ग, राजगड आदी किल्ल्यांवर शौचकूप आहेत, पण ते तटबंदीच्या आतच भुयार किंवा कोनाड्यासारखे बांधून काढले आहेत. पूर्वीच्या काळी तटावर चोवीस तास पहारेकरी असायचे (जश्या आज आपल्या शिफ्ट ड्यूट्या असतात). ह्या पहारेकऱ्यासाठी केलेली हि सोय आहे, जेणेकरून त्यांना नित्यविधींसाठी तटापासून लांब जायची गरज भासणार नाही.
मला ह्या शौचकुपांचं फार विशेष वाटतं. बहुतांश किल्ल्यांवर फक्त दरवाजे, तटबंदी आणि बांधकामाच्या जोती शिल्लक राहिल्या आहेत. 'शौचकूप' हे एक बांधकाम असं आहे की जे अजूनही आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, आणि त्याच्या रचनेत फारसे बदल झालेला नाही!
इथून थोडं पुढे गेल्यावर आपण 'त्या' भिंतीच्या दुसऱ्या टोकापाशी येतो जी दरवाज्यापासून किल्ल्याला दोन भागात विभागते. इथून भिंतीला डावीकडे ठेवत पुन्हा लोखंडी दरवाज्यापाशी यायचं, आणि लोखंडी दरवाज्यातून डावीकडे बाहेर पडायचं.

इथे आपल्या डाव्या हाताला भवानी मातेचं प्रशस्त मंदिर आणि त्याला लागूनच असलेलं एक घर आहे. ह्या मंदिर परिसराचे तीन विभाग आहेत
१) मंदिरासमोरील अंगण, इथे एक मोठं तुळशी वृंदावन(समाधी?) आहे.
२) मंदिराचा सभामंडप.
३) मंदिराचा गाभारा. खरंतर दोन गाभारे आहेत, एका गाभाऱ्यात शिवलिंग आणि भैरोबा तर दुसऱ्या गाभाऱ्यात भवानी मातेची शस्त्रसज्ज मूर्ती आहे. हि मूर्ती पारगड आणि प्रतापगड ह्या किल्ल्यांवर असलेल्या मूर्तीशी साधर्म्य असलेली, पण आकारानं लहान आहे. ही मूर्ती ज्या खडकात घडवली त्याचा प्रकार अगदी प्रतापगड आणि पारगडावरील मूर्तीच्या खडकाशी मिळत जुळता आहे. गाभाऱ्याचा बाजूलाच गणेशाची देखणी मूर्ती आहे.
मंदिर आणि परिसर रचना
श्री गणेशाची मूर्ती

वरील आकृतीमध्ये मी ह्या बांधकामाची साधारण रचना दाखवायचा प्रयत्न केला आहे.
मंदिराला लागून एक घर आहे. ह्याला वाडा म्हणता येणार नाही, ना हि ह्याला सदर म्हणता येईल. हे एक साधं घर किंवा भक्तांसाठी मुक्कामाची सोय असावी. भिंतींमध्ये दिवे ठेवण्यासाठी अनेक कोनाडे आहेत. घरातच एका कोपऱ्यात दोन भिंती बांधून एक भाग वेगळा काढला आहे. हे स्नानगृह असावे.


तुळशी वृन्दावन

हे बघून आपण मंदिराच्या मागे असणारी विहीर बघायची. हि विहीर म्हणजे दगडाची प्रचंड मोठी खाण आहे. ह्या आयताकृती विहिरीची लांबी अंदाजे चोवीस मीटर, रुंदी अठरा मीटर आणि सरासरी खोली पाच-सहा मीटर आहे. किल्ल्याच्या बांधकामातील दगड ह्याच खाणीतून काढले आहेत.
वापरलेल्या दगडाचे काम झाल्यावर अश्या खाणींचा उपयोग नंतर विहिरी म्हणून केला गेला. महिपालगड, सामानगड सारख्या किल्ल्यांवर ह्या खाणींना पाणी लागले आणि त्या त्या ठिकाणी एकच मोठीच्या मोठी विहीर तयार झाली.
दगडाची खाण, मागे मंदिर परिसर

पण कलानिधीगड, संतोषगड या किल्ल्यांवर खाणीमध्ये पाणी लागलेले दिसत नाही. त्यामुळे खाणीच्या तळाशी अजून खोल खणून विहिरी काढण्यात आल्या. कलानिधीगडावर ह्या खाणीत तीन कोपऱ्यात तीन विहिरी खणल्या आहेत. ह्यातील एकच विहीर सध्या वापरात आहे. बाकी दोन बुजलेल्या स्थितीमध्ये आहेत. वापरात असलेली विहीर अंदाजे पन्नास फूट खोल आहे. जानेवारी मध्ये ह्यातील पाण्याची पातळी अंदाजे चाळीस फुटांवर होती. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय आहे, त्यामुळे किल्ल्यावर येताना लांब दोर बाळगावा.

आज्ञापत्रात पंत म्हणतात -
"गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणी ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळपर्येंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे, जसें तसें पाणीही पुरतें, म्हणुन तितकियावरीच निश्चिंती न मानावी. उद्योग करावा, किनिमित्य कीं, झुंजामध्यें भांडियांचे (तोफांच्या) आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरीतां तसे जागीं जखिरियाचें पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं बांधावीं. त्यातील पाणी खर्च होऊं न द्यावें, गडाचे पाणी बहुत जतन राखावें."
महाराजांच्या दूरदृष्टीला काय म्हणावे! त्यांच्या विचारला अनुसरूनच त्या काळी किल्ल्यांचा बांधकाम केलं गेलं, त्यामुळे आपल्याला बहुतांश किल्ल्यांवर पाण्याची अनेक टाकी बघायला मिळतात.
युद्धामध्ये पाणी स्रोतांमध्ये विष टाकून तो निरुपयोगी करणे हि सुद्धा एक नीती होती. त्यामुळे अश्या वेळेस गडावर अनेक टाकी, तीही किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात असणे केव्हाही सोयीचेच होते!

विहीर पाहून आम्ही किल्ल्याच्या दक्षिणेकडील तटबंदीचा फेरफटका मारायला निघालो. वाटेत घरांच्या आणि इतर बांधकामाच्या अनेक जोत्या आहेत. त्यात एक जोत इतरांपेक्षा लांबी-रुंदीने मोठी आहे. हा किल्लेदाराचा वाडा असावा.
येथील तटबंदीला लागूनच एक धान्यकोठार आहे. त्याचेही मध्ये भिंत बांधून दोन भाग केलेले दिसतात.

आतापर्यंत आपण जे जे अवशेष बघितले त्यावरून एक कळतं की किल्ल्यावर बऱ्यापैकी वस्ती असावी आणि ही वस्ती किल्ल्याच्या ह्याच भागात होती.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किल्ल्याच्या सध्या वापरात असलेल्या दरवाज्यापासून जी आडवी भिंत बांधली आहे, ती किल्ल्याचे दोन भाग करते. भिंतीच्या एका बाजूला दारुकोठार आहे. (बीएसएनएल चा टॉवर आहे त्याच्या शेजारी). दुसऱ्या भागात मंदिर, अंगण, त्याशेजारील घर, इतर बांधकामाचे आणि घरांचे अवशेष आहेत. धान्यकोठार सुद्धा आहे.
पंतांनी आज्ञापत्रात काय म्हटलंय ते पाहू -
"दारूखाना घराजवळ घराचे परिघाकाली नसावा. आठ पंधरा दिवसांत हवालदाराने येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मागुती मुद्रा करुन ठेवीत जावें. दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्यांणी रात्रं दिवस पहा-या प्रमाणे जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्या येऊं न द्यावे. किल्ला संरक्षणाचे कारण ते भांडी व बंदुका, याकरीता किल्ल्यांत हशम ठेवावेत (ते) बंदुकीचे ठेवावेत"
दारूकोठाराजवळ घरे असू नयेत(ते धोक्याचे आहे). दारुगोळा वेळोवेळी बाहेर काढून त्याची देखभाल बघितली जायची. परवानगी शिवाय दारूकोठारापाशी येण्यास मज्जाव होता.
किल्ल्याच्या एका भागात घरे तर दुसऱ्या भागात बीएसएनएल च्या चौकीशेजारील बांधकाम आहे. आज्ञापत्रात सूचना लक्षात घेता हे बांधकाम म्हणजे वाडा नसून दारुकोठार किंवा युद्धसामग्री संबंधातील एखादं बांधकाम असावं असा माझा तर्क आहे.
कलानिधीगड बांधणाऱ्याकडे जागा कमी उपलब्ध होती. गडाला बालेकिल्ला किंवा माची नाही. त्यामुळे किल्ल्याला दोन भागात मोडणाऱ्या जाड भिंतीचे प्रयोजन हे संरक्षणासाठी, आणि लष्करी गोष्टी मूळ वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी असावं असं मला वाटतं.

धान्यकोठाराच्या बाजूला आम्हाला किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याचे भग्नावशेष दिसले. हाच किल्ल्याचा मुख्य दरवाजा! हा दरवाजा म्हणजे दोन दरवाज्यांचा समूह आहे. पहिला (बाहेरील) दरवाजा पश्चिमेकडे तोंड करून, तर दुसरा (आतील) दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून बांधला आहे. दोन्ही दरवाजे मजबूत तटबंदीने जोडले आहेत. एका दरवाज्यातून दुसऱ्यामध्ये जाण्यासाठी ९० अंशात वळायला लागतं. ह्याच वेळेस शत्रूची पाठ दिसते.
भग्नावस्थेतील मुख्य दरवाजा



शिळेवर असणारी गणपतीची मूर्ती


मुख्य दरवाजा नकाशा, आत येणारी वाट बुरुज तटबंदीच्या विळख्यात आहे
भग्न दरवाजा

सध्या हा दरवाजा पूर्णपणे पडझड झालेला आहे. इतका, की इथं एक दरवाजा आहे हे ओळखायला खूप बारीक नजरेनं बघावं लागतं. दगडांच्या शीळांचा मोठा ढीग इथे जमा झाला आहे. त्यातीलच एका आडव्या शिळेमध्ये कोरलेला गणपती दरवाज्याची साक्ष पटवून देतो. दरवाज्याच्या बाजूचे बुरूज अतिशय धोकादायक झालेले आहेत. 
दुर्गांची ही अवस्था बघून स्वर्गातील त्या किल्लेदाराला कितीवेळा आवंढा गिळायला लागत असेल, ते त्यालाच ठाऊक.

दरवाज्याला लागून असलेल्या तटबंदीवरून आपण पश्चिम दिशेला चालत राहायचं. इथे एक शानदार बुरूज उभा आहे.
किल्ल्यावर असणारा एक शानदार बुरुज, त्यात वरती तोफ डागण्याची जागा दिसत आहे. बुरुजाच्या मध्य उंचीवर जंग्या दिसत आहेत

ह्यापुढील तटबंदी फोडून ट्रॅक्टरचा रस्ता गडावर आणला आहे. ह्या बुरुजावरून सूर्यास्त बघणं हा एक स्वर्गीय अनुभव होता. लांबवर पारगड आणि आंबोली घाटातले डोंगर डोळ्याचं पारणं फेडत होते.
असं दृश्य फक्त गड-किल्ल्यांवरच
इथून पुढे चालत गेल्यावर पश्चिमेकडील भक्कम बुरूज येतो. ह्याच बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीमध्ये आपल्याला अलंगा दिसतात. अलंगा म्हणजे पहारेकऱ्यांच्या विश्रांतीची जागा.
तटबंदीला लागून असलेल्या अलंगा

हे बघून किल्ल्याची तटबंदी डाव्या हाताला ठेवून आम्ही  मागे फिरलो. पुन्हा मंदिरापाशी आलो. येथे गडफेरी पूर्ण झाली. संपूर्ण किल्ला बघताना मनाला अपार समाधान मिळालं.


किल्ल्यावरून दिसणारे जंगमहट्टी जलाशयाचे दृश्य 


त्या काळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य अशा गडकिल्ल्यांची उभारणी करण्यात आली. प्रत्येक किल्ल्यावरील बांधकामाला एक वेगळा अर्थ आहे. हे बांधकाम घडविणारा कारागीर वेगळा आहे, त्यामुळे त्यात विविधता आहे. ह्या बांधकामातच आपल्या इतिहासाची आणि समाजरचनेची पायामुळं आहेत.
ह्या किल्ल्यांना नुसत्या भेट देऊन परतण्यापेक्षा, जर ते समजून घेतले तर त्यातून अधिक मजा तर येतेच, शिवाय त्या वास्तूबद्दल आणि आपल्या पूर्वजांबद्दल मनात आदरभाव निर्माण होतो.

Saturday, October 1, 2016

भुदरगड - Bhudargad

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग !
गड किल्ल्यांना परमोच्च महत्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. ह्या गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं.
महाराजांच्या नजरेत प्रत्येक किल्ल्याचं महत्व हे अनन्य साधारण होतं. त्यांनी एक एक किल्ला हा एक एक राज्य असल्याप्रमाणे जपला. कोल्हापूर जिल्ह्यात उभे असणारे भक्कम किल्ले ह्याची साक्ष देतात.
सिंधुदुर्ग आणि गोमंतकात उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी, तसंच विजापूर येथील सत्तेवर आणि गोमंतकातील पोर्तुगीजांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याच्या दक्षिणेकडील ह्या किल्ल्यांचा वापर केला गेला.

सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे ११ किल्ले नोंदीमध्ये आहेत. भुदरगड हा त्यातलाच एक महत्वाचा किल्ला !
माहित असलेल्या इतिहासाप्रमाणे - शिलाहार राजा भोज (दुसरा) यानं हा किल्ला बांधला. छत्रपती  शिवाजी महाराजांनी इथं नवीन बांधकाम करून किल्ल्याला एका प्रबळ लष्करी ठाण्याचं स्वरूप दिलं. भुदरगडाची मोठ्या प्रमाणात शाबूत असणारी तटबंदी आणि तिच्याखालील ताशीव कडे बघितल्यावर ह्याचा प्रत्यय येतो.
दुर्दैवाने हा गड पुन्हा अदिलशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला.
जिंजी वरून परत येताना छत्रपती राजाराम महाराजांनी काही काळ ह्या किल्ल्यावर वास्तव्य केलं.

भुदरगड किल्ला - विकीमापिया
http://wikimapia.org/#lang=en&lat=16.250420&lon=74.149346&z=15&m=b&search=bhudargad%20fort

कोल्हापूरच्या दक्षिणेस  साधारणपणे ७० कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुण्यापासून अंदाजे सव्वा-तीनशे किलोमीटर.
इतक्या लांबचा किल्ला बघायचा म्हंटल्यावर अनेक योग जुळून यावे लागतात. दोन दिवसांची सुट्टी, इतक्या लांब (बाईक वर) येण्याची तयारी असणारे आणि "किल्ल्यावर काय बघायचं" हा प्रश्न न पडणारे सोबती.
एन एच फोर आणि अपाचे ह्यांचं समीकरण केव्हाचं जुळलेलं ! निखिल आणि त्याची पल्सार सोबतीला.
पहाटे लवकर पुण्याहून निघून संध्याकाळी चहाला भुदरगडावर असा बेत ठरला. वाटेत साताऱ्या जवळची लिंब गावातील 'बारा मोटेची विहीर' बघायचं नक्की केलं. ह्या विहिरीविषयी एक वेगळा लेख इथे लिहिला आहे - 
http://bhushankarmarkarworld.blogspot.in/2016/08/bara-motechi-vihir.html

दुपारी साडेबाराच्या सुमारास कोल्हापुरात पोचलो. 'ओपल हॉटेल' मधलं 'तांबडं-पांढरं' जेवण आणि त्यावर कॅरॅमल कस्टर्ड आणि रबडी !

कोल्हापूर - कागल - गारगोटी - भुदरगड असा प्रवास करून पाच-साडेपाचच्या सुमारास आम्ही किल्ल्यावर पोचलो. गाडीरस्ता वरपर्यंत जात असल्यानं वरती पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी होती. गडाचा माथा सपाट आणि विस्तीर्ण आहे. तुलना करायची झाल्यास विसापूरच्या पठाराशी करता येईल.
भूदरगडाचं  विस्तीर्ण पठार
भुदरगड किल्ल्याची खरी ओळख म्हणजे तिथला दूधसागर तलाव. त्याचं दृश्य बघून मन प्रसन्न झालं.
भुदरगडाचं वैभव - विस्तीर्ण दुधसागर तलाव
पावसाळ्यात पाणी वाहून जाणाऱ्या दगडाच्या खाचेत बांध घालून पाणी अडवलंय. शिवकाळात हा तलाव इतका मोठा नव्हता. इंग्रजांनी तलावाच्या दुसऱ्या बाजूस अजून एक मोठी भिंत बांधून ह्या तलावाचं विस्तृतीकरण केलं आहे. ह्यातील पाणी मात्र पिण्यासाठी अयोग्य आहे. पाण्याला (इथल्या मातीच्या गुणधर्मामुळे?) दुधी रंग आला आहे.

तलाव बघून आम्ही किल्ल्याचा फेरफटका मारायला निघालो. तलावाच्या डाव्या बाजूनं चालत गेल्यावर भवानी मातेचं मंदिरआहे. भवानी मातेची शस्त्रसज्ज मूर्ती विलोभनीय आहे. मंदिराचं वैशिष्ट्य असं कि, मुख्य गाभाऱ्याच्या समोर एक सभामंडप बांधला आहे. जुन्या वाड्यांच्या ओसऱ्या किंवा सज्जा ज्या पद्धतीचे असतात, त्या प्रकारचं ह्याचं बांधकाम आहे. (आपल्या कसबा गणपती मंदिराचा सभामंडप साधारण अश्या प्रकारचा आहे)
मंदिराचा नकाशा (प्रमाणात नाही)
पूर्वीच्या काळी लग्न, मुंज, यज्ञ असे धार्मिक विधी किंवा इतर सामाजिक कार्यक्रम हे मंदिरातच होत असत. मंडपाच्या मधल्या मैदानी जागेत अंदाजे शेकडा माणसे सामावली जाऊ शकतात. लोकांना सामावून घेण्याची गरजच मंदिर आणि त्या समोर बांधलेल्या सभामंडपाच्या रचनेचे कारण असावं. मंदिर आणि सभामंडपाची अशी रचना फार पूर्वीपासून चालत आलेली आहे, आणि आजही गावोगावी बांधल्या जाणाऱ्या मंदिरातून ती आपल्याला दिसून येते.

काही पावलं पुढे गेल्यावर काही समाध्या दिसल्या. त्याच्या पुढे एक विशिष्ट रचनेत बांधलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचा गाभारा जमीन पोखरून तयार केला आहे. वरून पाहता या भागात मंदिर आहे ह्याचा पत्ताही लागत नाही. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर छोटंसं सभामंडप तयार केलेलं आहे.
गाभाऱ्यात अनेक देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत.
पोखरून तयार केलेला मंदिराचा गाभारा
परकीयांच्या हल्ल्यांपासून देवता आणि मंदिरांचं रक्षण व्हावं म्हणून अश्या प्रकारची बांधणी असावी !

काही अंतर चालून गेल्यावर घरांच्या अनेक जोती दृष्टीस पडल्या. पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर असणारे, एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते! एक बैलगाडी जाऊ शकेल इतका रस्त्यांचा विस्तार, आणि त्यांच्या बाजूला घरांची बांधणी. त्या काळातील घरांची रचना अतिशय 'प्लॅनिंग' करून केलेली होती. धोडपच्या सोनारमाची वरील घरांची जोती, अथवा राजगडाच्या बालेकिल्ल्यावरील राजवाड्याच्या जोती, किंवा इतरही किल्ल्यांवरील बांधकामात हे प्लॅनिंग आढळून येतं !
आपल्या शहरातील "पेठा" ह्या अश्याच  बांधकाम रचनेतून जन्मास आलेल्या आहेत.

घरांच्या बाजूलाच एक सुबक बांधणीचं शंकराचं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या डाव्या बाजूला चालत गेलो असता एक छोट्या आकाराचा साचपाण्याचा तलाव लागला.
सुबक बांधणीचं शंकराचं मंदिर. अलीकडे बांधकामाचे चौथरे
तलाव डावीकडे  ठेऊन आम्ही समोर असणाऱ्या तटबंदीवर चढलो. तटबंदीची रुंदी अंदाजे पाच ते सहा फूट, तर उंची अंदाजे दहा फूट आहे. तटबंदीच्या बाहेरील बाजूचा खडक तासून तिची बिकटता अजूनच वाढवलेली आहे.

तटबंदीवरुन फेरफटका मारताना खाली "जानकीपेठ" गाव  दिसत होतं. तटबंदी अखंड नसून मध्ये मध्ये जागा सोडली आहे. ह्या मोकळ्या ठिकाणी पाषाण कडे सरळसोट ३०-४० फूट खोल आहेत. त्यामुळे इथं भक्कम तटबंदीची आवश्यकता वाटली नसावी. ह्या ठिकाणी जुनी कमी उंचीच्या तटबंदीची जोती दिसतात, जी शिवकाळाच्याही पूर्वी उभारण्यात आली असावी असं वाटतं.
फांजीवर चढण्यासाठी पायऱ्या
तटबंदीवरुन फेरफटका मारताना आम्ही किल्ल्याच्या दक्षिण भागात  पोचलो. इथं जानकीपेठ गावातून येणारा कच्चा गाडीरस्ता किल्ल्यावर येतो. ज्या भागातील तटबंदी ढासळली आहे त्या त्या भागात सरकारनं  नवीन भिंत वजा तटबंदी बांधून गडाचं पूर्वीचं रूप परत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

भुदरगडाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरावरही मोठी सपाटी आहे. सध्या तिथं पवनचक्क्या उभारण्यात येत आहेत.
तटबंदीच्या लगोलग चालत गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूला आलो. इथून खाली असणाऱ्या जंगलाचं दृश्य डोळ्याचं पारणं फेडत होतं.



तटबंदीला मध्ये मध्ये बुरुज आहेत. तटबंदीमधे एके ठिकाणी आतील बाजूस एक खोलीसदृश जागा आहे. बहुदा ही पहारेकरांच्या विश्रांतीसाठी बांधलेली खोली, ज्याला 'अलंग' म्हणतात ती असावी. तटबंदीच्या बाजूस कोरड्या पडलेली पाण्याची दोन टाकी दिसली. दोन्ही टाकी दगड खोदून तयार केलेली आहेत. त्यांचा आकार साधारण चौकोनी असून खोली जेमतेम चार फूट आहे. टाक्यांच्या आत उतरण्यासाठी ओबडधोबड पायऱ्या खणल्या आहेत. माझ्या अंदाजानुसार ह्या पाण्याच्या विहिरी नसून, दगडाच्या खाणी असाव्यात. ह्याच दगडाचा वापर करून तटबंदी बांधली गेली असावी,
बारा फुटांपर्यंत उंच असणारी भूदरगडाची तटबंदी. तिथं काम करत असणाऱ्या सफाई कामगारांच्या उंचीवरून तटबंदीच्या उंचीचा अंदाज येऊ शकतो.

कोरड्या पडलेल्या विहिरी/ दगडाच्या खाणी
तटबंदीचा फेरफटका मारून आम्ही पुन्हा दूधसागर तलावापाशी आलो. तिथे एक मस्त जागा बघून तंबू टाकला. सूर्य मावळ्याची वेळ समीप आली होती. बॅग मधून दुर्बीण काढून पळत पुन्हा तटबंदी वर जाऊन बसलो.
अस्ताला जाणारा सूर्य आणि त्यानं आकाशात पसरलेले रंग डोळ्याचं पारणं फेडत होते. दुर्बिणीमधून सूर्यावरील डाग (सौरडाग/सॅन स्पॉट) स्पष्ट दिसत होते. कानावर पडणारा पक्षांचा किलबिलाट आणि अंगाला थंडगार स्पर्श करून जाणारा मंद वारा मनातलं वातावरण प्रसन्न करत होता.

एव्हाना किल्ल्यावर आमच्या खेरीज कोणीच दिसत नव्हतं. लांबवरून किल्ल्याची डागडुजी करणाऱ्या कामगारांचा आवाज ऐकू येत होता. किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या भैरवनाथ मंदिरात त्यांचा मुक्काम असावा.

दिवसभरात साडे तीनशे किलोमीटर बाईकचा प्रवास आणि नंतर इतका सुंदर किल्ला बघून दिवस सार्थकी लागला होता. वाढणाऱ्या अंधाराबरोबरच आकाशातील तारे अधिक ठळक होत होते. रात्री ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाची मेजवानी मिळणार हे नक्की होतं !
परिश्रम करून पेटवलेल्या शेकोटीवर आधी सूप मग म्यागी झालं. शरीरही तृप्त झाल्यावर गाणी ऐकत निवांत पडलो. रात्री दुर्बिणीतून चंद्रावरील विवर, आकाशगंगेचा पट्टा आणि अनेक जुळे-तारे बघितले.

उगवणाऱ्या सूर्याबरोबरच आमची सकाळ झाली.









आवरून तलावाच्या पलीकडे असणारं शंकराचं मंदिर बघितलं. शुष्कसांधी शैलीचं हे मंदिर प्राचीन आहे.

मंदिराच्या छताचा भाग



जवळच असलेलं एक भग्न मंदिर
त्यानंतर भैरवनाथाचं मंदिर बघितलं. मंदिर प्राचीन आहे. मंदिराच्या समोर असणाऱ्या बुरुजावर एक तोफ ठेवली आहे.

मंदिरासमोरील दीपमाळ, शेजारी तोफ
भैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूला राजवाड्याचे अवशेष आणि सदरेच्या जोती शिल्लक आहेत. गडावरील अवशेष, मंदिरे, घरांच्या जोती असे अवशेष बघितल्यावर किल्ला मोठ्या प्रमाणात राबता होता हे जाणवतं.

किल्ला बघून आम्ही किल्ल्यावरून निघालो. खरंतर किल्ल्यावरून पाय निघत नव्हता. अजून एखादी रात्र इथं काढून मग निघावं अशी इच्छा होत होती. प्रत्येक क्षणाला जॅकपॉट लागल्याप्रमाणे आनंद देणारे ट्रेक फार थोडे असतात !

भुदरगडावरून आमची स्वारी निघाली गगनगडावर ! गूगल मॅप राधानगरी ते गगनगड असा एक रस्ता दाखवत होता. पण तिथे गेल्यावर समजलं कि हा फारच कच्चा रास्ता आहे.
त्या क्षणाला गूगल मॅप वरचा विश्वास कमी झाला. कारण मागल्या वेळेस पारगडला जातानाही गूगलनं आमची अशीच फजिती केली होती.


रस्ता शोधत, घाटवाटांवरून रास्ता नेईल तिथे आणि असेल तश्या रस्त्यावर गाड्या मारत दुपारी बाराच्या सुमारास गगनगड गाठला.
घाटमाथ्यावरून कोकणच्या दिशेनं बाहेर आलेलं एक टोक म्हणजे गगनगड आहे !
किल्ल्याच्या उत्तरेकडून भुई बावडा घाट, तर दक्षिणेकडून करूळ घाट खाली कोकणात उतरतो. पूर्वीपासून वापरात असणाऱ्या आणि कोकणातील मालवण भागातील बंदरांकडे घेऊन जाणाऱ्या ह्या महत्वाच्या घाटवाटा. अश्या मोक्याच्या जागेवर किल्ला नसेल तरच नवल !
गगनगड स्थान
गगनगड हे पु. गगनगिरी महाराजांचे निवासस्थान होतं. रविवार असल्यानं इथं भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. गगनगिरी महाराजांची गुहा तसेच काही मंदिरं किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात आहेत. अजून काही पावले चालत पुढे गेल्यावर बालेकिल्ला आहे.
किल्ल्याचा विस्तार फार मोठा नाही. किल्ल्यावर एक विहीर आणि तटबंदीच्या चार दगडांखेरीज बघण्यासारखंही काही नाही. किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागात एक छोटंसं माचीसदृश बांधकाम आहे. माचीच्या तत्बंदीच्या जोती नजरेस पडतात.
दुपारच्या कडक उन्हात, अनवाणी हिंडत, तळपायाला चटके सोसत किल्ला बघितला. अश्या वेळेस एकही फोटो काढायला जमलं नाही ह्याची खंत मनात सलतीये.

अडीच वाजता गाड्या कोल्हापूरच्या दिशेनं निघाल्या. चार वाजता कोल्हापुरात चहा झाला. तिथून एन एच फोर वर रमत गमत रात्री सडेनऊ वाजता आम्ही पुण्यात पोचलो.

महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या आणि इतिहासातील अनेक घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या भुदरगडाला शतश: नमन _/\_

*सर्व फोटो श्रुती आणि निखील कडून साभार.

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...