Sunday, March 26, 2017

कलानिधीगड (कलानंदीगड) - Kalanidhigad (Kalanandi gad)

      गड किल्ल्यांना परमोच्च महत्त्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. महाराजांनी योग्य जागा हेरल्या. मोक्याच्या जागेच्या आजूबाजूच्या डोंगरावर बुरूज-तटबंदीचा शेला पागोटा चढवून किल्ल्यांची उभारणी केली.
रामचंद्रपंत अमात्य विरचित आज्ञापत्रात महाराजांचे किल्ल्यांविषयी असलेले विचार प्रकट होतात. त्यात म्हटलंय - "राज्यरक्षणाचें मुख्य कारण किल्ले, देशोदेशी स्थळे पाहून बांधावे."

कोल्हापूर जिल्ह्यातला कलानिधीगड हा असाच एक देखणा किल्ला. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. सिंधुदुर्ग आणि गोमंतकात उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी.


कालिवाडे गावातून कलानिधीगड
गड कसा असावा आणि त्याच्या रचनेसंदर्भातील कागदोपत्री वाचलेली माहिती मी ह्या किल्ल्यावर अगदी यशस्वीपणे पडताळून पहिली. किल्ले फक्त बघण्यापेक्षा ते समजून घ्यायला खूप जास्ती मजा येते !
रामचंद्रपंत अमात्य ह्यांनी गड बांधणीबाबत आज्ञापत्रात नमूद केलेल्या 'सूचना' हा किल्ला बांधणाऱ्या स्थापत्यवीराने तंतोतंत पाळल्या आहेत. कलानिधीगडावर ह्याची चटकन जाणीव होते ह्याचं कारण गड विस्ताराने लहान आहे, आणि इतक्या कमी जागेत किल्ल्यावर आवश्यक अश्या सर्व प्रकारच्या इमारती उभारल्या आहेत. हे एक प्रकारचं 'चॅलेंज' म्हणावं लागेल. कोणती इमारत कुठे असावी हे सुद्धा आज्ञापत्रातील उल्लेखाला अनुसरून आहे. लेखात मी त्या गोष्टींचा पडताळा नमूद करणार आहे.

बेळगाव-आंबोली रस्त्यावर बेळगाव पासून अंदाजे २५ किमी अंतरावर कालिवडे हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे. गडावर पायी जाण्यासाठी सध्या कालिवडे गावातून जाणारी पायवाट वापरात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रॅक्टर जाईल असा अजून एक कच्चा दगडी रस्ता सुद्धा काढला आहे. हा गडाला लांबची फेरी मारून वरती येतो. आम्ही ह्या दगडी रस्त्यानं न जात पायवाट पकडली आणि किल्ला चढायला सुरुवात केली.

वाटेत खंडोबाचं (कि एखाद्या वीराचं?) उद्ध्वस्त मंदिर आणि मूर्त्या दिसल्या. चढताना मध्येच मुख्य पायवाट सोडून दुसऱ्या कमी रुळलेल्या वाटेनं गेल्यामुळे मंदिराचे हे अवशेष बघायला मिळाले.


वाटेमध्ये असलेली वीराची मूर्ती

गडाचा दरवाजा गाठायला अंदाजे दीड तास लागला. सुस्थितीत असणारा हा दरवाजा खरंतर गडाचा दुसरा दरवाजा आहे. ह्याचं कारण किल्ला फिरताना आम्हाला भग्न झालेला गडाचा मुख्य दरवाजा दिसला, जो दुसऱ्या दिशेला आहे.
ह्या सुस्थितीत असणाऱ्या दुसऱ्या दरवाज्याची रचना गोमुखी म्हणता येणार नाही. जागेअभावी दरवाज्यास गोमुखी पद्धतीनं बांधणं शक्य झालं नसावं. पण दरवाजा एका सशक्त बुरुजाच्या मागे लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. दरवाज्याच्या डावीकडील बुरूज त्याला बरोबर कवेत घेतो. (वर्धनगडाची चोर दिंडी अगदी ह्याच पद्धतीनं बांधली आहे). 
आज्ञापत्रात पंत म्हणतात-
"दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून, पुढे बुरूज देऊन, येतिजाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, यांकरिता गड पाहून, एक दोन तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यांमध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या"


गडाचा सुस्थितीत असणारा दरवाजा, उजवीकडील बुरुजामध्ये तोफ डागण्याची जागा आणि जंग्या दिसत आहेत
दरवाज्याची रचना - वर येणारी पायवाट बुरुजांच्या कुशीतून किल्ल्यात प्रवेश करते

दरवाज्यातून आत आल्यावर मागील बाजूस फांजीवर जाण्यास बांधलेल्या पायऱ्या दृष्टीस पडतात.

दरवाजा आतील बाजूने
दरवाज्याकडे पाठ करून उभं राहिल्यास उजवीकडील तटबंदी गडाच्या पश्चिम टोकापर्यंत शाबूत आहे. ह्याच ठिकाणी डाव्या हाताला एक लांबलचक भिंत बांधली आहे. जी गडाच्या दक्षिण टोकाच्या तटबंदीला जाऊन मिळते. ह्या भिंतीची जाडी अंदाजे सव्वा मीटर तर लांबी जवळपास सत्तर मीटर आहे(जीपीएस मेझरमेन्ट). ही भिंत तटबंदी नाही, तर किल्ल्यावरील सपाट प्रदेशाचे दोन भाग करण्यासाठी आहे (ज्याला आपण मराठीत 'पार्टिशन वॉल' म्हणतो).
अशी भिंत बांधायचं प्रयोजन आणि त्या संदर्भातील आज्ञापत्रातील उल्लेख लेखामध्ये पुढे देतो आहे.
गडाची विकीमापिया इमेज
सध्या ह्या भिंतीला मध्येच खिंडार पाडून एक लोखंडी दार बसवलं आहे. ह्या लोखंडी दारातून प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्वेकडील विभागात प्रवेश करतो. समोरच बीएसएनएलची चौकी आहे. चौकीत कालिवडे गावातील दोन व्यक्ती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम पाहतात. ह्या चौकीच्या शेजारी टॉवर उभारला आहे.
इथून डाव्या बाजूनं पुढे गेल्यावर दारुकोठार आहे (नकाशा बघावा). एके ठिकाणी ह्याचा उल्लेख वाडा म्हणून आलेला आहे. परंतु मला हा वाडा किंवा कोणाच्या राहण्याची जागा वाटत नाही. हे दारुकोठार किंवा युद्धसामग्री संबंधातील एखादं बांधकाम असावं. ह्याचं कारण लेखात मी पुढे दिलं आहे.
ह्याच दिशेनं पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्व टोकावरील बुरुजावर येतो. ह्या ठिकाणावरून कालिवडे गावातून येणारी पायवाट दृष्टीस पडते.
तटबंदी डावीकडे ठेवत गडाच्या दक्षिण दिशेला चालत राहिल्यावर आपल्याला त्या काळी बांधण्यात आलेलं शौचकूप (संडास) दृष्टीस पडतं. गडाच्या तटबंदीला अगदी चिकटून ह्याचं बांधकाम आहे (तटबंदीची भिंत दोन्हीमध्ये 'कॉमन' आहे). असे अजून तीन शौचकूप ठराविक अंतरावर दिसतात. लोहगड, सिंधुदुर्ग, राजगड आदी किल्ल्यांवर शौचकूप आहेत, पण ते तटबंदीच्या आतच भुयार किंवा कोनाड्यासारखे बांधून काढले आहेत. पूर्वीच्या काळी तटावर चोवीस तास पहारेकरी असायचे (जश्या आज आपल्या शिफ्ट ड्यूट्या असतात). ह्या पहारेकऱ्यासाठी केलेली हि सोय आहे, जेणेकरून त्यांना नित्यविधींसाठी तटापासून लांब जायची गरज भासणार नाही.
मला ह्या शौचकुपांचं फार विशेष वाटतं. बहुतांश किल्ल्यांवर फक्त दरवाजे, तटबंदी आणि बांधकामाच्या जोती शिल्लक राहिल्या आहेत. 'शौचकूप' हे एक बांधकाम असं आहे की जे अजूनही आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, आणि त्याच्या रचनेत फारसे बदल झालेला नाही!
इथून थोडं पुढे गेल्यावर आपण 'त्या' भिंतीच्या दुसऱ्या टोकापाशी येतो जी दरवाज्यापासून किल्ल्याला दोन भागात विभागते. इथून भिंतीला डावीकडे ठेवत पुन्हा लोखंडी दरवाज्यापाशी यायचं, आणि लोखंडी दरवाज्यातून डावीकडे बाहेर पडायचं.

इथे आपल्या डाव्या हाताला भवानी मातेचं प्रशस्त मंदिर आणि त्याला लागूनच असलेलं एक घर आहे. ह्या मंदिर परिसराचे तीन विभाग आहेत
१) मंदिरासमोरील अंगण, इथे एक मोठं तुळशी वृंदावन(समाधी?) आहे.
२) मंदिराचा सभामंडप.
३) मंदिराचा गाभारा. खरंतर दोन गाभारे आहेत, एका गाभाऱ्यात शिवलिंग आणि भैरोबा तर दुसऱ्या गाभाऱ्यात भवानी मातेची शस्त्रसज्ज मूर्ती आहे. हि मूर्ती पारगड आणि प्रतापगड ह्या किल्ल्यांवर असलेल्या मूर्तीशी साधर्म्य असलेली, पण आकारानं लहान आहे. ही मूर्ती ज्या खडकात घडवली त्याचा प्रकार अगदी प्रतापगड आणि पारगडावरील मूर्तीच्या खडकाशी मिळत जुळता आहे. गाभाऱ्याचा बाजूलाच गणेशाची देखणी मूर्ती आहे.
मंदिर आणि परिसर रचना
श्री गणेशाची मूर्ती

वरील आकृतीमध्ये मी ह्या बांधकामाची साधारण रचना दाखवायचा प्रयत्न केला आहे.
मंदिराला लागून एक घर आहे. ह्याला वाडा म्हणता येणार नाही, ना हि ह्याला सदर म्हणता येईल. हे एक साधं घर किंवा भक्तांसाठी मुक्कामाची सोय असावी. भिंतींमध्ये दिवे ठेवण्यासाठी अनेक कोनाडे आहेत. घरातच एका कोपऱ्यात दोन भिंती बांधून एक भाग वेगळा काढला आहे. हे स्नानगृह असावे.


तुळशी वृन्दावन

हे बघून आपण मंदिराच्या मागे असणारी विहीर बघायची. हि विहीर म्हणजे दगडाची प्रचंड मोठी खाण आहे. ह्या आयताकृती विहिरीची लांबी अंदाजे चोवीस मीटर, रुंदी अठरा मीटर आणि सरासरी खोली पाच-सहा मीटर आहे. किल्ल्याच्या बांधकामातील दगड ह्याच खाणीतून काढले आहेत.
वापरलेल्या दगडाचे काम झाल्यावर अश्या खाणींचा उपयोग नंतर विहिरी म्हणून केला गेला. महिपालगड, सामानगड सारख्या किल्ल्यांवर ह्या खाणींना पाणी लागले आणि त्या त्या ठिकाणी एकच मोठीच्या मोठी विहीर तयार झाली.
दगडाची खाण, मागे मंदिर परिसर

पण कलानिधीगड, संतोषगड या किल्ल्यांवर खाणीमध्ये पाणी लागलेले दिसत नाही. त्यामुळे खाणीच्या तळाशी अजून खोल खणून विहिरी काढण्यात आल्या. कलानिधीगडावर ह्या खाणीत तीन कोपऱ्यात तीन विहिरी खणल्या आहेत. ह्यातील एकच विहीर सध्या वापरात आहे. बाकी दोन बुजलेल्या स्थितीमध्ये आहेत. वापरात असलेली विहीर अंदाजे पन्नास फूट खोल आहे. जानेवारी मध्ये ह्यातील पाण्याची पातळी अंदाजे चाळीस फुटांवर होती. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय आहे, त्यामुळे किल्ल्यावर येताना लांब दोर बाळगावा.

आज्ञापत्रात पंत म्हणतात -
"गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणी ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळपर्येंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे, जसें तसें पाणीही पुरतें, म्हणुन तितकियावरीच निश्चिंती न मानावी. उद्योग करावा, किनिमित्य कीं, झुंजामध्यें भांडियांचे (तोफांच्या) आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरीतां तसे जागीं जखिरियाचें पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं बांधावीं. त्यातील पाणी खर्च होऊं न द्यावें, गडाचे पाणी बहुत जतन राखावें."
महाराजांच्या दूरदृष्टीला काय म्हणावे! त्यांच्या विचारला अनुसरूनच त्या काळी किल्ल्यांचा बांधकाम केलं गेलं, त्यामुळे आपल्याला बहुतांश किल्ल्यांवर पाण्याची अनेक टाकी बघायला मिळतात.
युद्धामध्ये पाणी स्रोतांमध्ये विष टाकून तो निरुपयोगी करणे हि सुद्धा एक नीती होती. त्यामुळे अश्या वेळेस गडावर अनेक टाकी, तीही किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात असणे केव्हाही सोयीचेच होते!

विहीर पाहून आम्ही किल्ल्याच्या दक्षिणेकडील तटबंदीचा फेरफटका मारायला निघालो. वाटेत घरांच्या आणि इतर बांधकामाच्या अनेक जोत्या आहेत. त्यात एक जोत इतरांपेक्षा लांबी-रुंदीने मोठी आहे. हा किल्लेदाराचा वाडा असावा.
येथील तटबंदीला लागूनच एक धान्यकोठार आहे. त्याचेही मध्ये भिंत बांधून दोन भाग केलेले दिसतात.

आतापर्यंत आपण जे जे अवशेष बघितले त्यावरून एक कळतं की किल्ल्यावर बऱ्यापैकी वस्ती असावी आणि ही वस्ती किल्ल्याच्या ह्याच भागात होती.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किल्ल्याच्या सध्या वापरात असलेल्या दरवाज्यापासून जी आडवी भिंत बांधली आहे, ती किल्ल्याचे दोन भाग करते. भिंतीच्या एका बाजूला दारुकोठार आहे. (बीएसएनएल चा टॉवर आहे त्याच्या शेजारी). दुसऱ्या भागात मंदिर, अंगण, त्याशेजारील घर, इतर बांधकामाचे आणि घरांचे अवशेष आहेत. धान्यकोठार सुद्धा आहे.
पंतांनी आज्ञापत्रात काय म्हटलंय ते पाहू -
"दारूखाना घराजवळ घराचे परिघाकाली नसावा. आठ पंधरा दिवसांत हवालदाराने येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मागुती मुद्रा करुन ठेवीत जावें. दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्यांणी रात्रं दिवस पहा-या प्रमाणे जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्या येऊं न द्यावे. किल्ला संरक्षणाचे कारण ते भांडी व बंदुका, याकरीता किल्ल्यांत हशम ठेवावेत (ते) बंदुकीचे ठेवावेत"
दारूकोठाराजवळ घरे असू नयेत(ते धोक्याचे आहे). दारुगोळा वेळोवेळी बाहेर काढून त्याची देखभाल बघितली जायची. परवानगी शिवाय दारूकोठारापाशी येण्यास मज्जाव होता.
किल्ल्याच्या एका भागात घरे तर दुसऱ्या भागात बीएसएनएल च्या चौकीशेजारील बांधकाम आहे. आज्ञापत्रात सूचना लक्षात घेता हे बांधकाम म्हणजे वाडा नसून दारुकोठार किंवा युद्धसामग्री संबंधातील एखादं बांधकाम असावं असा माझा तर्क आहे.
कलानिधीगड बांधणाऱ्याकडे जागा कमी उपलब्ध होती. गडाला बालेकिल्ला किंवा माची नाही. त्यामुळे किल्ल्याला दोन भागात मोडणाऱ्या जाड भिंतीचे प्रयोजन हे संरक्षणासाठी, आणि लष्करी गोष्टी मूळ वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी असावं असं मला वाटतं.

धान्यकोठाराच्या बाजूला आम्हाला किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याचे भग्नावशेष दिसले. हाच किल्ल्याचा मुख्य दरवाजा! हा दरवाजा म्हणजे दोन दरवाज्यांचा समूह आहे. पहिला (बाहेरील) दरवाजा पश्चिमेकडे तोंड करून, तर दुसरा (आतील) दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून बांधला आहे. दोन्ही दरवाजे मजबूत तटबंदीने जोडले आहेत. एका दरवाज्यातून दुसऱ्यामध्ये जाण्यासाठी ९० अंशात वळायला लागतं. ह्याच वेळेस शत्रूची पाठ दिसते.
भग्नावस्थेतील मुख्य दरवाजा



शिळेवर असणारी गणपतीची मूर्ती


मुख्य दरवाजा नकाशा, आत येणारी वाट बुरुज तटबंदीच्या विळख्यात आहे
भग्न दरवाजा

सध्या हा दरवाजा पूर्णपणे पडझड झालेला आहे. इतका, की इथं एक दरवाजा आहे हे ओळखायला खूप बारीक नजरेनं बघावं लागतं. दगडांच्या शीळांचा मोठा ढीग इथे जमा झाला आहे. त्यातीलच एका आडव्या शिळेमध्ये कोरलेला गणपती दरवाज्याची साक्ष पटवून देतो. दरवाज्याच्या बाजूचे बुरूज अतिशय धोकादायक झालेले आहेत. 
दुर्गांची ही अवस्था बघून स्वर्गातील त्या किल्लेदाराला कितीवेळा आवंढा गिळायला लागत असेल, ते त्यालाच ठाऊक.

दरवाज्याला लागून असलेल्या तटबंदीवरून आपण पश्चिम दिशेला चालत राहायचं. इथे एक शानदार बुरूज उभा आहे.
किल्ल्यावर असणारा एक शानदार बुरुज, त्यात वरती तोफ डागण्याची जागा दिसत आहे. बुरुजाच्या मध्य उंचीवर जंग्या दिसत आहेत

ह्यापुढील तटबंदी फोडून ट्रॅक्टरचा रस्ता गडावर आणला आहे. ह्या बुरुजावरून सूर्यास्त बघणं हा एक स्वर्गीय अनुभव होता. लांबवर पारगड आणि आंबोली घाटातले डोंगर डोळ्याचं पारणं फेडत होते.
असं दृश्य फक्त गड-किल्ल्यांवरच
इथून पुढे चालत गेल्यावर पश्चिमेकडील भक्कम बुरूज येतो. ह्याच बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीमध्ये आपल्याला अलंगा दिसतात. अलंगा म्हणजे पहारेकऱ्यांच्या विश्रांतीची जागा.
तटबंदीला लागून असलेल्या अलंगा

हे बघून किल्ल्याची तटबंदी डाव्या हाताला ठेवून आम्ही  मागे फिरलो. पुन्हा मंदिरापाशी आलो. येथे गडफेरी पूर्ण झाली. संपूर्ण किल्ला बघताना मनाला अपार समाधान मिळालं.


किल्ल्यावरून दिसणारे जंगमहट्टी जलाशयाचे दृश्य 


त्या काळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य अशा गडकिल्ल्यांची उभारणी करण्यात आली. प्रत्येक किल्ल्यावरील बांधकामाला एक वेगळा अर्थ आहे. हे बांधकाम घडविणारा कारागीर वेगळा आहे, त्यामुळे त्यात विविधता आहे. ह्या बांधकामातच आपल्या इतिहासाची आणि समाजरचनेची पायामुळं आहेत.
ह्या किल्ल्यांना नुसत्या भेट देऊन परतण्यापेक्षा, जर ते समजून घेतले तर त्यातून अधिक मजा तर येतेच, शिवाय त्या वास्तूबद्दल आणि आपल्या पूर्वजांबद्दल मनात आदरभाव निर्माण होतो.

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...