Saturday, October 1, 2016

भुदरगड - Bhudargad

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग !
गड किल्ल्यांना परमोच्च महत्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. ह्या गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं.
महाराजांच्या नजरेत प्रत्येक किल्ल्याचं महत्व हे अनन्य साधारण होतं. त्यांनी एक एक किल्ला हा एक एक राज्य असल्याप्रमाणे जपला. कोल्हापूर जिल्ह्यात उभे असणारे भक्कम किल्ले ह्याची साक्ष देतात.
सिंधुदुर्ग आणि गोमंतकात उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी, तसंच विजापूर येथील सत्तेवर आणि गोमंतकातील पोर्तुगीजांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याच्या दक्षिणेकडील ह्या किल्ल्यांचा वापर केला गेला.

सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे ११ किल्ले नोंदीमध्ये आहेत. भुदरगड हा त्यातलाच एक महत्वाचा किल्ला !
माहित असलेल्या इतिहासाप्रमाणे - शिलाहार राजा भोज (दुसरा) यानं हा किल्ला बांधला. छत्रपती  शिवाजी महाराजांनी इथं नवीन बांधकाम करून किल्ल्याला एका प्रबळ लष्करी ठाण्याचं स्वरूप दिलं. भुदरगडाची मोठ्या प्रमाणात शाबूत असणारी तटबंदी आणि तिच्याखालील ताशीव कडे बघितल्यावर ह्याचा प्रत्यय येतो.
दुर्दैवाने हा गड पुन्हा अदिलशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला.
जिंजी वरून परत येताना छत्रपती राजाराम महाराजांनी काही काळ ह्या किल्ल्यावर वास्तव्य केलं.

भुदरगड किल्ला - विकीमापिया
http://wikimapia.org/#lang=en&lat=16.250420&lon=74.149346&z=15&m=b&search=bhudargad%20fort

कोल्हापूरच्या दक्षिणेस  साधारणपणे ७० कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुण्यापासून अंदाजे सव्वा-तीनशे किलोमीटर.
इतक्या लांबचा किल्ला बघायचा म्हंटल्यावर अनेक योग जुळून यावे लागतात. दोन दिवसांची सुट्टी, इतक्या लांब (बाईक वर) येण्याची तयारी असणारे आणि "किल्ल्यावर काय बघायचं" हा प्रश्न न पडणारे सोबती.
एन एच फोर आणि अपाचे ह्यांचं समीकरण केव्हाचं जुळलेलं ! निखिल आणि त्याची पल्सार सोबतीला.
पहाटे लवकर पुण्याहून निघून संध्याकाळी चहाला भुदरगडावर असा बेत ठरला. वाटेत साताऱ्या जवळची लिंब गावातील 'बारा मोटेची विहीर' बघायचं नक्की केलं. ह्या विहिरीविषयी एक वेगळा लेख इथे लिहिला आहे - 
http://bhushankarmarkarworld.blogspot.in/2016/08/bara-motechi-vihir.html

दुपारी साडेबाराच्या सुमारास कोल्हापुरात पोचलो. 'ओपल हॉटेल' मधलं 'तांबडं-पांढरं' जेवण आणि त्यावर कॅरॅमल कस्टर्ड आणि रबडी !

कोल्हापूर - कागल - गारगोटी - भुदरगड असा प्रवास करून पाच-साडेपाचच्या सुमारास आम्ही किल्ल्यावर पोचलो. गाडीरस्ता वरपर्यंत जात असल्यानं वरती पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी होती. गडाचा माथा सपाट आणि विस्तीर्ण आहे. तुलना करायची झाल्यास विसापूरच्या पठाराशी करता येईल.
भूदरगडाचं  विस्तीर्ण पठार
भुदरगड किल्ल्याची खरी ओळख म्हणजे तिथला दूधसागर तलाव. त्याचं दृश्य बघून मन प्रसन्न झालं.
भुदरगडाचं वैभव - विस्तीर्ण दुधसागर तलाव
पावसाळ्यात पाणी वाहून जाणाऱ्या दगडाच्या खाचेत बांध घालून पाणी अडवलंय. शिवकाळात हा तलाव इतका मोठा नव्हता. इंग्रजांनी तलावाच्या दुसऱ्या बाजूस अजून एक मोठी भिंत बांधून ह्या तलावाचं विस्तृतीकरण केलं आहे. ह्यातील पाणी मात्र पिण्यासाठी अयोग्य आहे. पाण्याला (इथल्या मातीच्या गुणधर्मामुळे?) दुधी रंग आला आहे.

तलाव बघून आम्ही किल्ल्याचा फेरफटका मारायला निघालो. तलावाच्या डाव्या बाजूनं चालत गेल्यावर भवानी मातेचं मंदिरआहे. भवानी मातेची शस्त्रसज्ज मूर्ती विलोभनीय आहे. मंदिराचं वैशिष्ट्य असं कि, मुख्य गाभाऱ्याच्या समोर एक सभामंडप बांधला आहे. जुन्या वाड्यांच्या ओसऱ्या किंवा सज्जा ज्या पद्धतीचे असतात, त्या प्रकारचं ह्याचं बांधकाम आहे. (आपल्या कसबा गणपती मंदिराचा सभामंडप साधारण अश्या प्रकारचा आहे)
मंदिराचा नकाशा (प्रमाणात नाही)
पूर्वीच्या काळी लग्न, मुंज, यज्ञ असे धार्मिक विधी किंवा इतर सामाजिक कार्यक्रम हे मंदिरातच होत असत. मंडपाच्या मधल्या मैदानी जागेत अंदाजे शेकडा माणसे सामावली जाऊ शकतात. लोकांना सामावून घेण्याची गरजच मंदिर आणि त्या समोर बांधलेल्या सभामंडपाच्या रचनेचे कारण असावं. मंदिर आणि सभामंडपाची अशी रचना फार पूर्वीपासून चालत आलेली आहे, आणि आजही गावोगावी बांधल्या जाणाऱ्या मंदिरातून ती आपल्याला दिसून येते.

काही पावलं पुढे गेल्यावर काही समाध्या दिसल्या. त्याच्या पुढे एक विशिष्ट रचनेत बांधलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचा गाभारा जमीन पोखरून तयार केला आहे. वरून पाहता या भागात मंदिर आहे ह्याचा पत्ताही लागत नाही. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर छोटंसं सभामंडप तयार केलेलं आहे.
गाभाऱ्यात अनेक देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत.
पोखरून तयार केलेला मंदिराचा गाभारा
परकीयांच्या हल्ल्यांपासून देवता आणि मंदिरांचं रक्षण व्हावं म्हणून अश्या प्रकारची बांधणी असावी !

काही अंतर चालून गेल्यावर घरांच्या अनेक जोती दृष्टीस पडल्या. पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर असणारे, एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते! एक बैलगाडी जाऊ शकेल इतका रस्त्यांचा विस्तार, आणि त्यांच्या बाजूला घरांची बांधणी. त्या काळातील घरांची रचना अतिशय 'प्लॅनिंग' करून केलेली होती. धोडपच्या सोनारमाची वरील घरांची जोती, अथवा राजगडाच्या बालेकिल्ल्यावरील राजवाड्याच्या जोती, किंवा इतरही किल्ल्यांवरील बांधकामात हे प्लॅनिंग आढळून येतं !
आपल्या शहरातील "पेठा" ह्या अश्याच  बांधकाम रचनेतून जन्मास आलेल्या आहेत.

घरांच्या बाजूलाच एक सुबक बांधणीचं शंकराचं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या डाव्या बाजूला चालत गेलो असता एक छोट्या आकाराचा साचपाण्याचा तलाव लागला.
सुबक बांधणीचं शंकराचं मंदिर. अलीकडे बांधकामाचे चौथरे
तलाव डावीकडे  ठेऊन आम्ही समोर असणाऱ्या तटबंदीवर चढलो. तटबंदीची रुंदी अंदाजे पाच ते सहा फूट, तर उंची अंदाजे दहा फूट आहे. तटबंदीच्या बाहेरील बाजूचा खडक तासून तिची बिकटता अजूनच वाढवलेली आहे.

तटबंदीवरुन फेरफटका मारताना खाली "जानकीपेठ" गाव  दिसत होतं. तटबंदी अखंड नसून मध्ये मध्ये जागा सोडली आहे. ह्या मोकळ्या ठिकाणी पाषाण कडे सरळसोट ३०-४० फूट खोल आहेत. त्यामुळे इथं भक्कम तटबंदीची आवश्यकता वाटली नसावी. ह्या ठिकाणी जुनी कमी उंचीच्या तटबंदीची जोती दिसतात, जी शिवकाळाच्याही पूर्वी उभारण्यात आली असावी असं वाटतं.
फांजीवर चढण्यासाठी पायऱ्या
तटबंदीवरुन फेरफटका मारताना आम्ही किल्ल्याच्या दक्षिण भागात  पोचलो. इथं जानकीपेठ गावातून येणारा कच्चा गाडीरस्ता किल्ल्यावर येतो. ज्या भागातील तटबंदी ढासळली आहे त्या त्या भागात सरकारनं  नवीन भिंत वजा तटबंदी बांधून गडाचं पूर्वीचं रूप परत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

भुदरगडाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरावरही मोठी सपाटी आहे. सध्या तिथं पवनचक्क्या उभारण्यात येत आहेत.
तटबंदीच्या लगोलग चालत गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूला आलो. इथून खाली असणाऱ्या जंगलाचं दृश्य डोळ्याचं पारणं फेडत होतं.



तटबंदीला मध्ये मध्ये बुरुज आहेत. तटबंदीमधे एके ठिकाणी आतील बाजूस एक खोलीसदृश जागा आहे. बहुदा ही पहारेकरांच्या विश्रांतीसाठी बांधलेली खोली, ज्याला 'अलंग' म्हणतात ती असावी. तटबंदीच्या बाजूस कोरड्या पडलेली पाण्याची दोन टाकी दिसली. दोन्ही टाकी दगड खोदून तयार केलेली आहेत. त्यांचा आकार साधारण चौकोनी असून खोली जेमतेम चार फूट आहे. टाक्यांच्या आत उतरण्यासाठी ओबडधोबड पायऱ्या खणल्या आहेत. माझ्या अंदाजानुसार ह्या पाण्याच्या विहिरी नसून, दगडाच्या खाणी असाव्यात. ह्याच दगडाचा वापर करून तटबंदी बांधली गेली असावी,
बारा फुटांपर्यंत उंच असणारी भूदरगडाची तटबंदी. तिथं काम करत असणाऱ्या सफाई कामगारांच्या उंचीवरून तटबंदीच्या उंचीचा अंदाज येऊ शकतो.

कोरड्या पडलेल्या विहिरी/ दगडाच्या खाणी
तटबंदीचा फेरफटका मारून आम्ही पुन्हा दूधसागर तलावापाशी आलो. तिथे एक मस्त जागा बघून तंबू टाकला. सूर्य मावळ्याची वेळ समीप आली होती. बॅग मधून दुर्बीण काढून पळत पुन्हा तटबंदी वर जाऊन बसलो.
अस्ताला जाणारा सूर्य आणि त्यानं आकाशात पसरलेले रंग डोळ्याचं पारणं फेडत होते. दुर्बिणीमधून सूर्यावरील डाग (सौरडाग/सॅन स्पॉट) स्पष्ट दिसत होते. कानावर पडणारा पक्षांचा किलबिलाट आणि अंगाला थंडगार स्पर्श करून जाणारा मंद वारा मनातलं वातावरण प्रसन्न करत होता.

एव्हाना किल्ल्यावर आमच्या खेरीज कोणीच दिसत नव्हतं. लांबवरून किल्ल्याची डागडुजी करणाऱ्या कामगारांचा आवाज ऐकू येत होता. किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या भैरवनाथ मंदिरात त्यांचा मुक्काम असावा.

दिवसभरात साडे तीनशे किलोमीटर बाईकचा प्रवास आणि नंतर इतका सुंदर किल्ला बघून दिवस सार्थकी लागला होता. वाढणाऱ्या अंधाराबरोबरच आकाशातील तारे अधिक ठळक होत होते. रात्री ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाची मेजवानी मिळणार हे नक्की होतं !
परिश्रम करून पेटवलेल्या शेकोटीवर आधी सूप मग म्यागी झालं. शरीरही तृप्त झाल्यावर गाणी ऐकत निवांत पडलो. रात्री दुर्बिणीतून चंद्रावरील विवर, आकाशगंगेचा पट्टा आणि अनेक जुळे-तारे बघितले.

उगवणाऱ्या सूर्याबरोबरच आमची सकाळ झाली.









आवरून तलावाच्या पलीकडे असणारं शंकराचं मंदिर बघितलं. शुष्कसांधी शैलीचं हे मंदिर प्राचीन आहे.

मंदिराच्या छताचा भाग



जवळच असलेलं एक भग्न मंदिर
त्यानंतर भैरवनाथाचं मंदिर बघितलं. मंदिर प्राचीन आहे. मंदिराच्या समोर असणाऱ्या बुरुजावर एक तोफ ठेवली आहे.

मंदिरासमोरील दीपमाळ, शेजारी तोफ
भैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूला राजवाड्याचे अवशेष आणि सदरेच्या जोती शिल्लक आहेत. गडावरील अवशेष, मंदिरे, घरांच्या जोती असे अवशेष बघितल्यावर किल्ला मोठ्या प्रमाणात राबता होता हे जाणवतं.

किल्ला बघून आम्ही किल्ल्यावरून निघालो. खरंतर किल्ल्यावरून पाय निघत नव्हता. अजून एखादी रात्र इथं काढून मग निघावं अशी इच्छा होत होती. प्रत्येक क्षणाला जॅकपॉट लागल्याप्रमाणे आनंद देणारे ट्रेक फार थोडे असतात !

भुदरगडावरून आमची स्वारी निघाली गगनगडावर ! गूगल मॅप राधानगरी ते गगनगड असा एक रस्ता दाखवत होता. पण तिथे गेल्यावर समजलं कि हा फारच कच्चा रास्ता आहे.
त्या क्षणाला गूगल मॅप वरचा विश्वास कमी झाला. कारण मागल्या वेळेस पारगडला जातानाही गूगलनं आमची अशीच फजिती केली होती.


रस्ता शोधत, घाटवाटांवरून रास्ता नेईल तिथे आणि असेल तश्या रस्त्यावर गाड्या मारत दुपारी बाराच्या सुमारास गगनगड गाठला.
घाटमाथ्यावरून कोकणच्या दिशेनं बाहेर आलेलं एक टोक म्हणजे गगनगड आहे !
किल्ल्याच्या उत्तरेकडून भुई बावडा घाट, तर दक्षिणेकडून करूळ घाट खाली कोकणात उतरतो. पूर्वीपासून वापरात असणाऱ्या आणि कोकणातील मालवण भागातील बंदरांकडे घेऊन जाणाऱ्या ह्या महत्वाच्या घाटवाटा. अश्या मोक्याच्या जागेवर किल्ला नसेल तरच नवल !
गगनगड स्थान
गगनगड हे पु. गगनगिरी महाराजांचे निवासस्थान होतं. रविवार असल्यानं इथं भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. गगनगिरी महाराजांची गुहा तसेच काही मंदिरं किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात आहेत. अजून काही पावले चालत पुढे गेल्यावर बालेकिल्ला आहे.
किल्ल्याचा विस्तार फार मोठा नाही. किल्ल्यावर एक विहीर आणि तटबंदीच्या चार दगडांखेरीज बघण्यासारखंही काही नाही. किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागात एक छोटंसं माचीसदृश बांधकाम आहे. माचीच्या तत्बंदीच्या जोती नजरेस पडतात.
दुपारच्या कडक उन्हात, अनवाणी हिंडत, तळपायाला चटके सोसत किल्ला बघितला. अश्या वेळेस एकही फोटो काढायला जमलं नाही ह्याची खंत मनात सलतीये.

अडीच वाजता गाड्या कोल्हापूरच्या दिशेनं निघाल्या. चार वाजता कोल्हापुरात चहा झाला. तिथून एन एच फोर वर रमत गमत रात्री सडेनऊ वाजता आम्ही पुण्यात पोचलो.

महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या आणि इतिहासातील अनेक घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या भुदरगडाला शतश: नमन _/\_

*सर्व फोटो श्रुती आणि निखील कडून साभार.

Friday, August 26, 2016

बारा मोटेची विहीर / Bara Motechi Vihir

  कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात असणारा भुदरगड बघायचा बेत ठरला तेव्हाच जाता जाता साताऱ्याजवळील लिंब गावातील 'बारा मोटेची विहीर' बघावी असं ठरलं. ह्या विहिरीच्या रचनेबद्दल एक वेगळा लेख लिहिणं योग्य वाटलं. भुदरगडाविषयी वेगळा लेख लिहणार आहेच.

फेसबुक आणि वॉट्सऍप वर ह्या विहिरीबद्दल बरंच वाचलं-बघितलं होतं. प्रत्यक्ष विहीर बघून कळलं कि जी माहिती सोशल मीडिया वर फिरत आहे, त्यातले फोटो हे ह्या विहिरीचे नसून चम्पानेर येथील दुसऱ्या एका विहिरीचे आहेत. त्या फोटो खालील माहिती मात्र ह्या बारा मोटेच्या विहिरीचीच दिलेली आहे. साहजिक बऱ्याच लोकांनी ही विहीर प्रत्यक्ष बघितली नसल्यानं जी माहिती मोबाईल आणि संगणकावर फिरतीये त्यावर विश्वास ठेवला जातो. वाचकांनी असल्या पोस्ट बद्दल दक्ष राहावं.

लिंब येथील बारा मोटेची विहीर आणि त्यावर बांधलेला राजमहाल/खलबतखाना
ही विहिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे ! जे काही बांधलेलं आहे, ते 'काय' बांधलंय आणि त्या बांधकामाचं 'प्रयोजन' काय हे जर अभ्यासपूर्वक जाणून घेतलं तर आपल्या पूर्वजांबद्दलच्या भावनेनं आपली छाती अभिमानानं अजून चार इंच फुलून येईल.

मुख्य विहीर अष्टकोनी आकाराची असून त्याच्या वरील बाजूस मोटा लावण्याच्या नऊ जागा आहेत. प्रत्येक तीन मोटांनंतर अष्ट बाजूंमधली एक बाजू मोकळी सोडली आहे. (तीन तीन मोटा 'अल्टर्नेट' बाजूंवर). एका बाजूच्या खालच्या अंगाला राजवाड्याचं बांधकाम आहे त्यामुळे ह्या बाजूवर मोटा नाहीत. त्याच्या डावी-उजवीकडे एक एक बाजूला सुद्धा मोटांचे चौथरे नाहीत.

विहिरीचा नकाशा (प्रमाणात नाही)
मोटांच्या जागांपासून पाणी पसरू न देता योग्य ठिकाणी वाहून नेण्यासाठी दगडात बांधलेले पाट आणि खाचा आहेत. सर्वच खाचा आज शाबूत नाहीत, कदाचित जमिनीखाली गाडल्या गेल्या असाव्यात किंवा ह्याचे दगड लोकांनी इतर बांधकामासाठी उचलून नेले असण्याची शक्यता आहे.

निमुळत्या आयताकृती भागात मुख्य विहिरीला जोडून असणाऱ्या दोन उपविहीरी आहेत. खरंतर ह्याला उपविहीर म्हणण्यापेक्षा 'हौद' संबोधलं तर जास्ती योग्य ठरेल.
मुख्य विहीर, त्याच्या उपविहिरी किंवा हौद आणि विहिरीमध्ये आत उतरायचा जिना ह्यांचा एकत्रित आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे आहे. अश्या आकाराच्या बऱ्याच विहिरी शिवकाळात बांधल्या गेल्या. त्यातील एक विहीर पुण्यात अरण्येश्वर जवळ आहे (सध्या अत्यवस्थ). अजून एक विहीर कादवे गावाजवळील शिरकोली इथं बघायला मिळते.

दोन हौदांच्या वरील भागात मोटा लावण्याच्या  प्रत्येकी तीन अशा एकूण सहा जागा आहेत. म्हणजे विहिरीला मोटा लावण्याच्या एकूण पंधरा जागा !

ह्यातील बारा मोटा एका वेळेस चालू असायच्या आणि उरलेल्या तीन ह्या 'बॅक अप' म्हणून होत्या. त्यामुळे विहिरीला बारा मोटेची विहीर म्हणतात, असं वाचण्यात आलं.
एका वेळी बारा (च) मोटा चालू ठेवण्यामागे काय प्रयोजन असावं? पाण्याच्या अधिक उपश्यासाठी पंधरा पैकी अधिकाधिक (जास्तीत जास्त पंधरा) मोटा वापरल्या जात असाव्यात. पावसाळ्यात किंवा गरज नसताना ह्यातील काही मोटाच वापरण्यात येत असाव्यात (बाराच मोटा का ? ह्या संदर्भात काही दस्तऐवज असल्यास कृपया तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा).

विहीर जमिनीच्या पातळीच्या बऱ्याच खाली म्हणजे जवळपास वीस फूट खाली बांधली आहे. येथपर्यंत जाण्यासाठी दगडी जिना बांधला आहे.

विहिरीच्या आत उतरण्यासाठी दगडी जिना

दगडी जिना आतील बाजूने
जिना संपला कि दगडी सपाट वाट आहे. जिन्या नंतरचा हा दगडी रस्ता मुख्य विहिरीच्या अगदी काठापर्यंत येऊन थांबतो. ह्या वाटेच्या दोन्ही बाजूला उपविहिरी किंवा हौद बांधले आहेत. रस्ता संपतो तिथे एक कमान बांधलेली आहे.

जिना उतरून खाली आल्यावर असणारा दगडी रस्ता. ह्याच्या डाव्या उजव्या बाजूला जी खोलगट जागा आहे, ते हौद आहेत. समोर कमान आहे त्याच्या पलीकडे मुख्य विहीर आहे.
हौदांच बांधकाम खूपच विचारपूर्वक केलेलं आहे. ह्या हौदांचा उपयोग असा कि, जेव्हा मुख्य विहिरीला पाणी भरपूर असेल, तेव्हा कमानीमधून ते आतमध्ये शिरेल (ओव्हरफ्लो). हे जास्तीचं पाणी दोन्ही बाजूंच्या हौदामध्ये आपोआप साठवलं जाईल. जेणेकरून आत उतरायचा जिना आणि त्याच्यापुढील वाटेवर पाणी साठून राहणार नाही. कारण हा भाग पाण्याने भरला तर विहिरीमध्ये आत उतरायची वाट आणि खलबतखान्यात जाणारे अंधारे जिने पाण्यानं भरून जातील.
ह्या भागातील पाण्याचं प्रमाण खूपच वाढल्यास दोन्ही हौदांच्या वरती असणाऱ्या मोटांनी पाणी बाहेर काढता येईल.

मुख्य विहिरीला लागून असणाऱ्या कमानीच्या बाजूच्या दोन्ही भिंतींमध्ये वरती जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांच्या ह्या वाटा अतिशय चिंचोळ्या असून एका वेळेस एकच व्यक्ती जा-ये करू शकते. पायऱ्यांची ही वाट अंधारी आहे, ती वर जाताना एक 'U' टर्न घेते. पायऱ्यांचे आकार एक सारखे नाहीत. वरती खलबतखाना बांधलेला आहे. खलबतखान्याच्या दोन विरुद्ध दिशांनी पायर्यांच्या वाटा वरती येतात.

कमानीच्या बाजूच्या भिंतींमध्ये जे कोनाडे दिसत आहेत, त्या वरील महालात जाण्याच्या वाटा आहेत

कमानीचा दुसऱ्या बाजूने घेतलेला फोटो. वरील बाजूस महालाचा सज्जा दिसत आहे.
हौदांच्या आणि मुख्य विहिरीच्या मधोमध बांधलेला महाल (खलबतखाना) विशेष पाहण्याजोगा आहे. ह्याच्या बांधकामात दगडी खांब आहेत. खांबावर मारुती, गणपती, गजारूढ महाराज, अश्वारूढ महाराज अशी शिल्प कोरलेली आहे. ह्या महालास एक सज्जा (गॅलरी)आहे. त्याची दिशा विहिरीच्या बाजूला आहे. सज्ज्यास तीन महिरपी कमानी, कमानीच्या प्रत्येक बाजूला एक अशी एकूण सहा कमळ शिल्पे कोरलेली आहेत.
ह्याखेरीज विहिरीच्या बांधकामातील वाघ, सिंह, शरभ ह्यांची शिल्प बघण्यासारखी आहेत. ह्या शिल्पांबद्दल अधिक माहिती गूगल वर मिळू शकेल.
महालाच्या छतावर सिंहासनाची आणि दरबाराची जागा आहे. (ह्या जागेवर अधिक बांधकाम असावं असा एक अंदाज. कारण सिंहासन आणि सभेचे ठिकाण उघड्यावर का असावे ? का हे सभास्थान सध्याच्या पंचायती प्रमाणे गावातील लोकांचे एकत्रीकरण करून चर्चा करण्यासाठी असावे ?)

महालमधील खांब व त्यावरील शिल्प

खांबांवरील कमळ शिल्प
विहिरीच्या बांधकामाची माहिती देणारा शिलालेख विहिरीमध्ये जाणाऱ्या पायर्यांच्या वाटेवर लावला आहे.
ह्या शिलालेखावरून संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज (पहिले शाहु महाराज) यांच्या काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ (इसवी सन १७१९ ते १७२४) या दरम्यान सौ. विरुबाई भोसले यांनी केले असं समजतं.
आत उतरायच्या जिन्याच्या कमानीवर असणारा शिलालेख
अमित कुलकर्णी यांनी काढलेले विहिरीचे अप्रतिम फोटो :
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-5-1620x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-6-1617x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-1-1440x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-4-1620x1080.jpg

सध्या तशी दुर्लक्षित असणारी ही विहीर आवर्जून बघण्यासारखी आहे हे नक्की !

*ह्या लेखातील सर्व फोटो निखील आणि श्रुती कडून साभार.

Sunday, July 31, 2016

भूषणगड, हरणाई देवी, यमाई देवी / Bhushangad, Harnai Devi, Yamai Devi


       सातारा जिल्ह्याला स्वत:च एक वेगळं दुर्गवैभव लाभलेलं आहे. सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडील घाटमाथ्यावर असलेले प्रतापगड, जंगली जयगड, वासोटा असे अनेक किल्ले, तर पूर्वेकडे खटाव आणि फलटण भागात संतोषगड, वारुगड, भूषणगड, वर्धनगड, महिमानगड, नांदगिरी असे किल्ले आहेत.

कुंभार्ली आणि वरंध घाटातून घाटवाट खाली कोकणात उतरते अन चिपळूण आणि महाड मार्गे अनेक बंदरांना जाऊन मिळते. ह्यांची सुरुवात पश्चिमेकडे पंढरपूर, विजापूर ह्या भागात होते. ह्याच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी साताऱ्यातील अनेक किल्ल्यांची बांधणी झालेली आढळून येते. पूर्व भागात वर्धनगड, महिमानगड ह्यातील मुख्य किल्ले, तर भूषणगड, संतोषगड यांसारखे पूरक किल्ले.

भूषणगड बघायचं फार आधीच पक्क झालेलं. जेव्हा ह्या किल्ल्याचा विषय निघाला, तेव्हा माझ्या नावाचा ('नावचा' किंवा 'नावावर' नव्हे ) एक किल्ला आहे हे ऐकून बऱ्याच लोकांना हसू आवरलं नाही. किल्ल्यास हे नाव कोणी आणि का दिलं हे मला माहिती नसल्यामुळे गप्प बसून राहण्यावाचून माझ्याकडे काही पर्याय नव्हता.
'चालायचच' !
बर्याच दिवसांनी योग आला आणि ट्रेकला यायला आठ जण तयार झाले. स्वप्निल (दत्त्या) आणि केदार बऱ्याच दिवसांनी ट्रेक मोहिमांमध्ये पुनरागमन करत होते. भर भरून जोक्स आणि अनुपस्थित लोकांचा उद्धार अश्यांनी सहल गाजणार हे निश्चित होतं !
भूषणगड किल्ला
ठरल्याप्रमाणे पहाटे पाचच्या सुमारास वडगाव चौकात सगळे जमलो. पुणे - सातारा - औंध असा प्रवास करत भूषणगड किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी पोचलो. वाटेमध्ये 'विरंगुळा' नावाच्या हॉटेल मध्ये आम्ही बराच 'विरंगुळा' केला !
भूषणगड औंध पासून सात-आठ किलोमीटर आहे (सातारा जिल्ह्यातील औंध, जे पूर्वी संस्थान होते). पायथ्यापासून किल्ल्याची उंची जेमतेम १०० मीटर असेल. घेराही फार मोठा नाही.
किल्ल्याला 'स्पर्श करून' परत निघण्यासाठी जे येणारे आहेत, त्यांच्यासाठी किल्ल्यावर फार बघण्यासारखं नाही. पण 'थोडसं' अभ्यासपूर्ण बघायचं झाल्यास किल्ल्यावर बघण्यासारखं आणि जाणून घेण्यासारखं बरंच काही आहे.

किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाचं नावही भूषणगडच आहे. किल्ल्याचं वैशिष्ट असं कि, फार दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात हा एकेमेव डोंगर आपलं लक्ष खेचून घेतो. त्यामुळे ह्याला ओळखायला सोपं गेलं.

लेखातील वर्णन वाचताना विकीमॅपिया लिंक बघितली, तर समजायला सोपं जातं
http://wikimapia.org/#lang=en&lat=17.465687&lon=74.405079&z=15&m=b&show=/35459220&search=bhushangad

पायथ्यापासून वरपर्यंत पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीला एक कमान बांधली आहे.
सुस्वागतम
पायऱ्या चढून जात असताना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पायऱ्यांचा मार्ग हा बहुतेक ठिकाणी डोंगर उजव्या हातास ठेवून बांधलेला आहे. तसच, उजव्या बाजूच्या ह्या डोंगरावर पायऱ्यांच्या वाटेच्या समांतर तटबंदी बांधलेली आहे.


डाव्या बाजूला दरी आणि  उजव्या बाजूला डोंगर अशी वाट

उजवीकडील डोंगराच्या वरील भागात पायऱ्यांच्या वाटेच्या समांतर तटबंदी 
पायऱ्यांच्या वाटेनं वर चढताना प्रत्येक जण तटबंदीच्या टप्प्यात येतो
गडावर जाणाऱ्या वाटेचं असं बांधकाम हे जाणूनबुजून केलं आहे. ह्यामागे एक नीती आहे.
शंभरातील नव्वद लोक उजव्या हाताचे तर फक्त दहा डावखुरे असतात. शत्रू सैन्यातील बहुतांश लोक आपल्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात ढाल पकडणार. वाटेच्या समांतर असणाऱ्या वरील भागातील तटबंदीवरून शत्रू 'टप्प्यात' येतो. शत्रूवर दगड धोंड्यांचा वर्षाव करायचा. दगडांना अडविण्यास उजव्या हातातील तलवार वापरणे ही 'नैसर्गिक' प्रतिक्रिया. ह्यामुळे तलवारी बोथट, वेड्यावाकड्या आणि निकामी होणार. ह्या अर्धमेल्या शत्रूनी चुकून गडाच्या आत प्रवेश केलाच, तर त्याचा पाडाव करणं म्हणजे तलवारीनी लोणी कापण्याइतकं सोपं !
राजगडाच्या पाली मार्गाने चढताना जो पहिला दरवाजा लागतो, त्याच्या आधीची पायवाट ह्याच प्रकारे काढण्यात आली आहे. संपूर्ण बुरुजाला प्रदक्षिणा घालून मार्ग वरती जातो. ह्यामध्ये बुरुज सतत उजव्या बाजूला राहतो. बुरुजातील जंग्या अश्या बांधल्या आहेत, पायवाटेने येणारा जाणारा प्रत्येक जण ह्यामधून दिसेल.

वर जात असताना वाटेत एक खंडोबाचं मंदिर लागलं. दाट, लांब मिशी, पसरलेले कान आणि वर 'गांधी टोपी' घातलेल्या खंडोबाची मूर्ती बघून थोडी गम्मत वाटली. आपल्या देव-देवतांच्या पोशाखांवर स्थानिक जीवन पद्धतीचा पगडा दिसून येतो त्याचंच हे एक  उत्तम उदाहरण.
मिशी आणि गांधी टोपी असलेला खंडोबा
काही पायऱ्या चढल्यावर किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आला. ह्याची बांधणी गोमुखी रचनेची आहे. दरवाज्यापर्यंत नेणारी वाट एकदा डावीकडे वळते आणि लगेच उजवीकडे वळते. 'z' आकाराच्या ह्या चिंचोळ्या मार्गाला तटबंदी आणि बुरुजांनी घेराव घातला आहे. प्रचंड संख्येने शत्रू आला, तरी ह्या चिंचोळ्या मार्गावर तो अडून राहणार अशी ही रचना (बॉटलनेक).

दरवाजा लपवून ठेवणे हाच अश्या बांधकामाचा हेतू !
 दरवाज्याची कमान पडली आहे. दरवाज्याच्या  एकात एक अश्या तीन कोरीव महिरपी आहेत. अवशेषांवरून ही कमान तिकोना किल्ल्याच्या दरवाज्याशी मिळती जुळती वाटली.

एकात एक अश्या तीन महिरपी, दरवाज्याचा उंबरा.
 दरवाज्याला आतल्या बाजूला लागून असलेल्या पहारेकर्यांच्या देवड्या अजूनही शाबूत आहेत. पेशवेकाळात देवड्यांची दुरुस्ती झाली हे निश्चितपणे सांगता येईल. ह्याचं कारण म्हणजे पेशव्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बाकीच्या काही किल्ल्यांवरील दरवाजे आणि देवड्या अगदी अश्याच शैलीत बांधलेल्या दिसतात.
संतोषगडाचा मुख्य दरवाजा किंवा धोडपचा हट्टी दरवाजा आणि पूर्व दरवाजा अगदी अश्याच शैलीत बांधलेले आढळतात. दगडांच्या लहान आकारावरूनही हे बांधकाम तुलनेने नवीन आहे हेही सांगता येतं. तसंच बांधकामात वापरेलला दगड 'नवीन' आहे, मुरुमी नाही.

दरवाजा ओलांडल्यावर दोन्ही बाजूला असणाऱ्या पहारेकर्यांच्या देवड्या
पहारेकर्यांची देवडी

दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर लागणारा चिंचोळा मार्ग
दरवाज्याच्या डावीकडील बुरुज अक्षरशः फुटला आहे. त्याच्या अंतरंगावरून बुरुजाचे बांधकाम कसे केले असावे ह्याचा अंदाज लावता येतो. प्रचंड मोठ्या शिळांनी बुरुजाच्या बाहेरील बाजूची परीघ-भिंत निश्चित करून आतमध्ये वेगवेगळ्या आकाराचे दगड आणि चुना मिश्रण 'कोंबले' आहे. त्यावर एक सपाटी, ज्याला स्लॅब म्हणता येईल, बांधलेली आहे.

काही पायऱ्या चढून पुढे गेल्यावर एक खोल खंदक सदृश खड्डा लागला. हा खड्डा म्हणजे पूर्वी वापरात असणारी दगडाची खाण आहे. ह्याच दगडांनी गडाचे बांधकाम केले गेले.
काही अंतरानं उजव्या बाजूला एक चौकोनी विहीर लागली. लांबी रुंदी साधारण आठ बाय आठ मीटर !
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी भाग. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून इतक्या मोठ्या आकाराची विहीर ! किल्ल्यावरील तटबंदी आणि इतर मंदिराचे बांधकाम बघता, बांधकाम समयी पाण्याची गरज मोठी असणार हे निश्चित.



दुर्दैव म्हणजे इथेही पाण्यात कचरा, थर्मोकोलची ताटे आणि बाटल्या... ते पाहून हृदय सोलवटून निघालं. आपल्या वारसा हक्कांचं महत्व आणि त्यामागे असलेलं आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व आपला समाज नेहमीच विसरत आला आहे. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी जेम्स डग्लसनेही हेच लिहून ठेवलं आहे. असो.

ह्या विहिरीच्या शेजारीच शंकराचे लहानसे मंदिर आहे. ते पाहून चार पायऱ्या चढल्यावर किल्ल्यावरील सध्याची प्रमुख वास्तू - हरणाई देवीचे देऊळ लागले. दुर्गा देवीचाच हा एक अवतार अशी माहिती पुजाऱ्याकडून मिळाली.

आई हरणाई देवी
देवळासमोर दीपमाळ आणि शेंदूर फासलेले दगड ठेवलेले दिसले. ह्या मंदिराशेजारीच गणपतीचे मंदिर आहे. श्रींची मूर्ती संगमरवरात घडवलेली आहे.




देवांचे दर्शन घेऊन आम्ही तटबंदीवरुन फेरफटका मारायला निघालो. किल्ल्याची तटबंदी चांगल्या प्रमाणात शाबूत आहे. दरवाज्याचे दोन बुरुज धरून एकूण दहा बुरुज शाबूत आहेत. काहीं ठिकाणी तटबंदी धोकादायक झालेली दिसली. तटबंदी मध्ये एक शौचकूप, पाणी साठवण्याची जागा, तोफा आणि बंदुकांसाठी साठी वेगवेगळ्या आकाराच्या जंग्या दिसल्या. गडाच्या माचीच्या मध्यभागावर एक मोठ्या आकाराचा बांधीव बुरुज आहे.
माचीच्या टोकावर एक मोठा बुरुज आहे. येथून डोंगराच्या खालच्या टप्प्यात एक मोठी पायवाट दिसत होती. ही पायवाट म्हणजे किल्ल्याच्या पश्चिम दिशेस असणाऱ्या भुयारी देवीच्या मंदिराकडे जाणारी पायवाट आहे.



किल्ल्याचे बुरुज, तटबंदी, खालच्या बाजूला भुयारी देवीकडे जाणारी पायवाट
किल्ल्याच्या माचीचं हे टोक असल्यानं पलीकडच्या बाजूने येणारी तटबंदी येथे येऊन मिळते. ह्या ठिकाणाहून आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूच्या तटबंदी वरून चालू लागलो.


माचीच्या टोकाला असणाऱ्या बुरुजावर
चालताना डाव्या बाजूस खालच्या टप्प्यावर किल्ल्यावर येण्याची पायऱ्यांची वाट दृष्टिक्षेपात दिसत होती. किल्ल्याची बांधणी करताना संरक्षणाचा किती विचार केला आहे हे जाणवलं.
किल्ला चढताना उजव्या डोंगराच्या वर दिसणारी हीच ती तटबंदी. येथून खाली वाकून पहिले असता पायऱ्यांची वाट दृष्टीक्षेपात येते.
ही तटबंदी मुख्य प्रवेशद्वाराला येऊन मिळाली आणि आमची गडफेरी पूर्ण झाली.

उतरताना काही पायऱ्या गेल्यावर एक वाट डाव्या दिशेने जाताना दिसली. हीच ती भुयारी देवीच्या मंदिराकडे जाणारी वाट. आम्ही मुख्य किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या भुयारी देवीच्या मंदिरापाशी आलो. कदाचित इथे आधी एक भुयार होतं आणि त्याच्या आतमध्ये देवीचं वास्तव्य असावं. हे भुयार आता बुजवण्यात आलय. तिथेच बाहेरच्या बाजूला देवीचं एक छोटंसं मंदिर उभारलेलं आहे.

भुयारी देवीकडे जाणाऱ्या मार्गावरून दिसणारा माचीच्या टोकावर असणारा बुरुज

भुयारी देवीची प्रसन्न मूर्ती
 हे पाहून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पाच-सात मिनटात गड उतरून खाली आलो. इथून औंध गाठलं.

औंधचं भवानी संग्रहालय बघितलं. औंध संस्थांचे तत्कालीन राजे कै. भवानराव पंतप्रतिनिधी यांनी १९३८ साली हे बांधलं. ह्यामध्ये शेकडो तेलचित्रे आणि अनेक कलाविष्कार आहेत. मोगल आणि मराठाकालीन शस्त्रात्रे बघण्यासारखी आहेत. संग्रहालयाच्या आवारात अनेक वीरगळी, बौद्ध मूर्ती, शंकर पार्वतीच्या मूर्ती ठेवल्या आहेत. (फोटो काढण्यास मनाई आहे.)

संग्रहायल बघून झाल्यावर थोडी पेटपूजा केली आणि गाड्या यमाई देवीच्या मंदिराबाहेर येऊन थांबल्या.
यमाई देवीविषयी खालील कथा सांगितली जाते -
यमाई देवी म्हणजे पार्वती मातेचा अवतार. प्रभू श्रीराम सीतामातेच्या शोधात असताना पार्वती मातेनं त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तिनं सीतामातेचा अवतार परिधान केला व प्रभू श्रीराम यांना दर्शन दिलं. परंतु श्रीराम हे साक्षात विष्णूचा अवतार असल्यानं त्यांनी पार्वती मातेला ओळखलं. त्यांनी मातेला "ये माई" अशी हाक मारली.
त्यावरून ह्या देवीचं "यमाई" असं नाव पडलं. यमाई देवीच्या अधिक माहितीसाठी: http://aundh.info/marathi/yamaidevi.php

हे मंदिर शुष्कसांधी शैलीचं, म्हणजेच दगड एकमेकांवर जोडताना कोणताही चुना अथवा तत्सम पदार्थ न वापरता बांधलं आहे. मंदिराची बांधणी कोल्हापूरच्या मंदिरासारखीच वाटली. कोल्हापूरचं मंदिर चालुक्य राजवटीमध्ये सातव्या आठव्या शतकात झालंय. पण यमाई देवीचं हे मंदिर यादवकालीन असावं असा माझा अंदाज आहे. तज्ज्ञांनी कृपया प्रकाश टाकावा.
मंदिराच्या गाभाऱ्यात अंदाजे दोन मीटर उंचीची यमाई देवीची भव्य मूर्ती आहे. देवीची जुनी स्वयंभू मूर्तीसुद्धा आहे.


मंदिराच्या सर्व बाजूंनी तटबंदी वजा भिंत उभारली आहे. भिंतीच्या आत सभामंडप आहेत. हे सगळं मंदिराच्या तुलनेने नवीन (बहुतेक पेशवेकालीन) बांधकाम आहे.
यमाई देवी पार्वतीचा अवतार, त्यामुळे मंदिरासमोर नंदी आहे


औंधासुर -  ह्याचा यमाई देवीनं पराभव केला. देवीच्या मंदिराशेजारी माझा पुतळा असावाअशी ह्या असुराची अंतिम इच्छा होती.  त्यामुळे त्याची मूर्ती मंदिराच्या परिसरात बघायला मिळते. ह्याच असुराच्या नावावरून गावाला औंध नाव मिळालंय.


मंदिराच्या भोवताली बांधलेले सभामंडप

मंदिराच्या बाजूने बांधलेली तटबंदी-  मंदिराच्या तुलनेने हे नवीन बांधकाम आहे
मंदिराच्या टेकडीवरून भोवतालचा लांब पर्यंतचा प्रदेश सृष्टिक्षेपात येत होता. पावसाळी वातावरणानं तर अजूनच प्रसन्न वाटत होतं.

यमाई देवीच्या टेकडीवरून दूरवर दिसणारा भूषणगडाचा एकमेव डोंगर
मंदिर बघून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत झाडाखालच्या एका स्टॉल वर चहा भजी अशी मस्त फिस्ट झाली !
येताना जरांडेश्वर, चंदन-वंदन, वैराटगड यांचं धावतं दर्शन घेतलं.

दत्या, केदार आणि सुमंत एकत्र असल्यानं ट्रीपच्या सुरुवातीपासूनच जी खेचाखेची सुरु झाली, ती अगदी शेवटपर्यंत सुरूच होती. इथे दांड्या असता तर अजूनच धुव्वा झाला असता. भूषणगड किल्ला तर बघण्यासारख आहेच, पण ट्रिप लक्षात राहण्याचं अजून एक कारण नक्कीच मिळालं. एक निवांत ट्रिप झाली.

"We didn't realize we were making memories, we just knew we were having fun !"

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...